नवी दिल्ली : आरोग्यास घातक असलेले हवा प्रदूषण रोखण्यासाठी देशभरात होणारी कोळशाची वाहतूक झाकलेल्या ट्रक किंवा बंद रेल्वे वॅगनमधून करण्याचा सरकारचा विचार असल्याचे कोळसा आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.
कोळसा खाणींमधून कोळसा बाहेर काढल्यानंतर त्याची वाहतूक करताना ती उघड्या वाहनांमधून किंवा रेल्वेच्या उघड्या मालगाड्यांमधून करणे पर्यावरणासाठी जास्त घातक असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषणात भर पडत असल्याचे निरीक्षण पर्यावरणविषयक संस्थांनी नोंदवले आहे. त्याचबरोबर वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये कोळसा वापरताना निर्माण होणाऱ्या राखेमुळे हवा प्रदूषणात भर पडत असते.
कोळशावर आधारित वीज निर्मिती प्रकल्पांतील प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यासाठीच गेल्या आठवड्यात सरकारने खास कोळशाच्या वाहतुकीसाठी झाकलेले ट्रक आणि रेल्वे वॅगन तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
- पीयूष गोयल, कोळसा आणि रेल्वे मंत्री