तेलंगणातील दर्शनम मोगुलैया हे नल्लामला टेकडीच्या काठावरील नागरकुर्नूल जिल्ह्यातील आहेत. त्यांचा जन्म औसलीकुंटा गावातील मडिगा (दलित) कुटुंबात झाला. शिक्षण न घेतल्याने नोकरीही मिळाली नाही. ते आता हैद्राबाद येथे मजूर म्हणून काम करतात. दुर्भाग्य हेच की त्यांना पद्मश्री मिळाला पण 'सन्मान' नाही.
हैदराबाद : 'किनेरा' या दुर्मिळ वाद्याला पुनरुज्जीवीत करून त्याचा प्रसार करत अनेक विलुप्त लोककलांमध्ये प्राण फुंकण्याचे काम करण्यात दर्शनम मोगुलैया यांनी आपली संपूर्ण हयात घालवली. त्यांच्या याच योगदानामुळे दोन वर्षांपूर्वी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले मोगुलैया अचानक प्रसिद्ध झाले. पद्मश्री मिळाल्यावर ते सेलिब्रिटी झाले. राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित झाल्यानंतर त्यांना राज्यातही मोठा मान मिळाला. तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री केसीआर ते मंत्री आणि सर्व अधिकाऱ्यांनी त्यांचे मनापासून स्वागत केले.
सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचे अनेक फोटो पोस्ट केले गेले. त्यांना सोशल मीडियावर प्रसिध्दी मिळाली , पण कालांतराने सगळेच त्यांना विसरले. आज ही पद्मश्री पुरस्कारप्राप्त व्यक्ती मजूर म्हणून काम करत आहे. आजकाल ते हैद्राबादजवळील एका बांधकाम साईटवर रोजंदारी मजूर म्हणून काम करून पोटाची खळगी आहे. तेलंगणा सरकारकडून पुरस्कार म्हणून मिळालेली १ कोटी रुपयांची रोख रक्कम कौटुंबिक गरजांवर खर्च केल्यावर आयुष्यात आणखी एक टर्निंग पॉइंट आला.
'किनेरा मोगुलैया' या नावाने प्रसिद्ध असलेले ७३ वर्षीय कलाकार दोन वेळचे जेवण मिळवण्यासाठी धडपडत आहेत. या वयात ते मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. नऊ मुलांचे वडील मोगुलैया यांनी एका मुलाखतीत सांगितले की 'माझ्या एका मुलाला फेफरे येतात. मला औषधांसाठी ( मुलासाठी आणि त्यांच्यासाठी) दरमहा किमान ७,००० रुपये लागतात. याशिवाय नियमित वैद्यकीय चाचण्या आणि इतर खर्च आहेत." त्यांच्या तीन मुलांचा आजाराने मृत्यू झाला. तीन विवाहित आहेत, इतर तीन अजूनही विद्यार्थीदशेत आहेत आणि मोगुलैयावर अवलंबून आहेत.त्यांच्या पत्नीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. मोगुलैया म्हणाले, 'मी कामासाठी अनेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अनेक लोकांनी सहानुभूती दाखवली तर काही जणांनी विनम्रपणे मला नाकारले. सर्वांनी माझ्या गौरवशाली भूतकाळाचे कौतुक केले आणि मला थोडेफार पैसेही दिले, पण मला रोजगार काही दिला नाही." पूर्वी परिस्थिती इतकी वाईट नव्हती. मोगुलैया म्हणाले, 'मी ते पैसे (एक कोटी रुपये राज्य अनुदान) माझ्या मुलांच्या लग्नासाठी वापरले. जेवढे कर्ज होते ते चुकते केले, नंतर मी शहराच्या (हैदराबाद) सीमेवर असलेल्या तुर्क्यमाजलमध्ये जमिनही विकत घेतली. घर बांधायला सुरुवात केली, पण पैसे संपल्यामुळे मध्येच थांबावे लागले."
राज्य सरकारने मंजूर केलेले १०,००० रुपये मासिक मानधन नुकतेच बंद केल्याने परिस्थिती आणखी कठीण झाल्याचे ते म्हणाले. असे का झाले ते त्यांना माहीत नाही. 'मी सरकारी कार्यालयांना सातत्याने भेटी देत असून मदतीसाठी लोकप्रतिनिधींना भेटत आहे. सर्वांनी होकारार्थी उत्तर दिले, पण काहीच केले नाही, मी नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली लोककला पुनरुज्जीवीत केली पण मी स्वतालाच जीवंत ठेवू शकेन की नाही याबाबत शंका येते" असे त्यांनी म्हटले. १ कोटी रुपयांच्या अनुदानासोबत, राज्य सरकारने हैदराबादजवळील रंगारेड्डी जिल्ह्यात कलाकारांसाठी ६०० चौरस यार्डचा भूखंड जाहीर केला होता. त्याचे वाटप अद्याप बाकी आहे.