अापण अनेकदा स्वतःला आनंदाबद्दल एक सोपी गोष्ट सांगत असतो. जास्त पगार, मोठी मालमत्ता किंवा बँकेत मोठी रक्कम आपल्याला आनंद देईल. पैसा नक्कीच महत्त्वाचा आहे. तो आपल्याला अन्न, आरोग्यसेवा, शिक्षण, सुरक्षितता आणि सततच्या आर्थिक काळजीपासून स्वातंत्र्य देऊ शकतो. तरीही पैसा आणि आनंद यातील नातं आपण सहसा जसा विचार करतो त्यापेक्षा जास्त गुंतागुंतीचं आहे.
ही गुंतागुंत अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड इस्टर्लिन यांनी मांडलेल्या ‘इस्टर्लिन पॅराडॉक्स’मध्ये दिसून येते. हा सिद्धांत असं सुचवतो की, एका समाजात श्रीमंत व्यक्ती गरीब व्यक्तींपेक्षा जास्त आनंदी असल्याचे सांगतात. मात्र, जेव्हा एखाद्या संपूर्ण देशाचे उत्पन्न काळाच्या ओघात वाढते, तेव्हा तिथल्या सरासरी आनंदात त्याच प्रमाणात वाढ होतेच असे नाही.
हा विचार एक महत्त्वाचा मानसशास्त्रीय प्रश्न उपस्थित करतो: आनंद आपल्याकडे काय आहे यावर ठरतो की आपल्याकडे जे आहे त्याचा आपण कसा अर्थ लावतो यावर? समजा दोन व्यक्ती दरमहा ६०,००० रुपये कमावतात. एक जण अशा भागात राहतो जिथे बहुतांश लोक ३०,००० रुपये कमावतात, तर दुसरी व्यक्ती अशा लोकांमध्ये राहते जे २ लाख रुपये कमावतात. दोघांचे उत्पन्न अगदी सारखे असले तरी, पहिली व्यक्ती स्वतःला सुरक्षित आणि यशस्वी मारेल, तर दुसऱ्या व्यक्तीला आपण वंचित किंवा अपयशी आहोत असे वाटू शकते.
हे सापेक्ष उत्पन्नाचे मानसशास्त्रीय महत्त्व स्पष्ट करते. आपण आपल्या आर्थिक स्थितीचे मूल्यमापन कधीही वेगळे ठेवून करत नाही. आपण आपली घरे, कपडे, सुट्ट्या, मुलांचे शिक्षण, व्यावसायिक यश आणि राहणीमान यांची तुलना आजूबाजूच्या लोकांशी करतो.
मानसिक समाधानावर झालेल्या संशोधनातून असे दिसून येते की, सामाजिक तुलना आपल्या जीवन समाधानावर जोरदार प्रभाव टाकू शकते. स्वतःच्या गटातील लोकांपेक्षा स्वतःला गरीब समजणे हे अनेकदा समाधान कमी होण्याशी जोडलेले असते. सोशल मीडियाच्या युगात ही समस्या अधिक गंभीर झाली आहे.
पूर्वी लोक प्रामुख्याने शेजारी, नातेवाईक आणि सहकाऱ्यांशी स्वतःची तुलना करायचे. आज गोव्यात किंवा भारताच्या कोणत्याही भागात राहणारी व्यक्ती मुंबई, दुबई किंवा लंडनमध्ये राहणाऱ्या लोकांच्या निवडक फोटोंशी आपल्या दैनंदिन आयुष्याची तुलना करू शकते. आपण इतरांची नूतनीकरण केलेली घरे, हॉटेलमधील जेवण, ब्रँडेड कपडे आणि परदेशी सुट्ट्या पाहतो. यामुळे मानसशास्त्रज्ञ ज्याला 'तुलनेचा सापळा' म्हणतात तो तयार होतो.
यातील दुसरी मानसशास्त्रीय प्रक्रिया म्हणजे 'हेडोनिक अडॅप्टेशन', ज्याला अनेकदा आनंदाची गिरणी (हॅपीनेस ट्रेडमिल) म्हटले जाते. पगारवाढ सुरुवातीला उत्साह आणू शकते. आपण सुट्टीचे नियोजन करू शकतो, पुढे ढकललेली एखादी खरेदी करू शकतो किंवा कर्ज फेडू शकतो. काही काळासाठी हे नवीन उत्पन्न आपला मूड सुधारते.
हळूहळू मात्र हे सुधारलेले राहणीमान सामान्य बनून जाते. लवकरच एक नवी इच्छा निर्माण होते. आपल्याला वाटू लागते की पुढचा आर्थिक टप्पा गाठल्यावरच आपल्याला कायमचा आनंद मिळेल. आपण कोणत्याही अंतिम ध्येयाशिवाय या गिरणीवर धावत राहतो. परिस्थितीशी जुळवून घेणे ही काही कमजोरी नाही. मात्र, जेव्हा आपण आनंदासाठी पूर्णपणे उपभोगावर अवलंबून राहतो, तेव्हा हे जुळवून घेणे न संपणाऱ्या असंतोषात बदलू शकते.
इस्टर्लिन पॅराडॉक्सचा असा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये की पैशाला काहीच महत्त्व नाही. आर्थिक संसाधने माणसाचा स्वतःच्या आयुष्यावरील नियंत्रणाचा भाव वाढवू शकतात. पैशामुळेच एखादे अस्वस्थ नाते सोडणे, उपचार घेणे, विश्रांती घेणे, मुलांना पाठिंबा देणे किंवा भविष्याचे नियोजन करणे शक्य होते.
म्हणूनच जेव्हा पैसा मूलभूत गरजा पूर्ण करतो आणि अगतिकता कमी करतो, तेव्हा त्याचा सर्वात मोठा भावनिक फायदा होतो. एकदा मूलभूत गरजा व्यवस्थित पूर्ण झाल्या की, अतिरिक्त उत्पन्नातून मिळणारा मानसिक आनंद कमी होऊ लागतो किंवा तो पैसा कसा वापरला जातो यावर अधिक अवलंबून राहतो.
आनंदावरील संशोधनातील अलीकडील वादांमध्ये अशा एका ठरावीक उत्पन्न पातळीवर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत, ज्यानंतर पैसा समाधानात भर घालणे बंद करतो. यातील व्यापक निष्कर्ष असा आहे की, अशी कोणतीही एकच रक्कम नाही जी प्रत्येकाला आनंदाची हमी देईल. पैसे कमावणे, बचत करणे, गुंतवणूक करणे आणि भविष्याचे नियोजन करणे हे समजूतदारपणाचे आहे. आर्थिक जबाबदारी स्वतःच मनाला शांतता देऊ शकते. अडचण तेव्हा सुरू होते जेव्हा आपले स्व-मूल्य हे उत्पन्न, मालमत्ता किंवा सामाजिक प्रतिष्ठेशी जोडले जाते.
आनंद म्हणजे पैशाचा त्याग करणे नव्हे. तर आर्थिक संसाधनांना जीवनाच्या यशाचे एकमेव माप न बनवता त्यांचा प्रभावीपणे वापर करण्याची क्षमता म्हणजे आनंद होय.
इस्टर्लिन पॅराडॉक्स आपल्याला आठवण करून देतो की वाढते उत्पन्न आपोआप वाढता आनंद निर्माण करत नाही. कदाचित 'आपल्यासाठी किती पुरेसे आहे' हे समजून घेणे हे अधिक शहाणपणाचे ध्येय असू शकते. हा दृष्टिकोन आपल्याला न संपणाऱ्या शर्यतीपासून दूर नेऊन खऱ्या आनंदाच्या जवळ घेऊन जाऊ शकतो.

- डॉ. उबाल्डिना नोरोन्हा, (सहयोगी प्राध्यापक, मानसशास्त्र विभाग, सेंट झेविअर्स कॉलेज, म्हापसा)


