नवी दिल्ली : पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या धमकीला घाबरून भारताने दहशतवादाविरोधातील कारवाई थांबवू नये, असा स्पष्ट दृष्टिकोन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखालील निर्णयप्रक्रियेत घेण्यात आल्याचे समोर आले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’पूर्वी झालेल्या उच्चस्तरीय चर्चेत पाकिस्तानच्या अण्वस्त्र क्षमतेचा आणि संभाव्य प्रतिक्रियेचा सखोल विचार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून वारंवार करण्यात येणारे अण्वस्त्रांचे संकेत हे भारताला पारंपरिक लष्करी कारवाईपासून रोखण्यासाठीचे एक प्रकारचे रणनीतिक दबावतंत्र असल्याचे डोवाल यांनी मांडले. अण्वस्त्रे ही एखाद्या देशाच्या अस्तित्वाच्या सुरक्षेसाठी असतात; लष्कर-ए-तैयबा किंवा जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांच्या तळांचे संरक्षण करण्यासाठी त्यांचा वापर होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जाते.
अण्वस्त्रांच्या धोक्याचे डोवाल यांचे मूल्यमापन
पाकिस्तानची अण्वस्त्र कमांड व्यवस्था केवळ दहशतवादी तळ वाचवण्यासाठी अणुयुद्धाचा धोका पत्करणार नाही, असे डोवाल यांचे मत होते. अण्वस्त्रांचा वापर झाल्यास भारताकडून मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तर मिळू शकते आणि त्याचा परिणाम पाकिस्तानच्या अस्तित्वावर होऊ शकतो, याची जाणीव तेथील नेतृत्वाला असल्याचे त्यांनी नमूद केल्याचे सूत्रांनी सांगितले.
भारताने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानातील दहशतवादी पायाभूत सुविधांवर कारवाई करण्याची तयारी दाखवली नाही, तर पाकिस्तानच्या लष्करी संरक्षणाखाली दहशतवादी संघटनांना कारवाया करण्यासाठी अण्वस्त्रांच्या छत्राचा फायदा मिळत राहील, असा युक्तिवादही या चर्चेत करण्यात आल्याचे समोर आले आहे.
मोदींचा स्पष्ट राजकीय आदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या दहशतवादी हल्ल्यांनंतर केवळ निषेध नोंदवून थांबण्याऐवजी कठोर प्रत्युत्तर देण्याचा स्पष्ट राजकीय आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वीच्या दहशतवादी हल्ल्यांमधील अनुभव, आयसी-८१४ विमान अपहरण, उरी हल्ला आणि पहलगाम दहशतवादी हल्ला यांसारख्या घटनांचाही निर्णयप्रक्रियेत विचार करण्यात आला. या संपूर्ण रणनीतीचा मुख्य उद्देश पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करणे आणि त्याच वेळी संघर्ष अणुयुद्धाच्या पातळीवर जाऊ न देणे हा होता.
हल्ल्याच्या सहा तास आधी लक्ष्य निश्चित
‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतिम टप्प्यात महत्त्वाची लक्ष्ये निश्चित करून त्यांची माहिती हल्ल्याच्या सुमारे सहा तास आधी संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, उपग्रह निरीक्षण आणि इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टिमसारख्या भारतीय संरक्षण यंत्रणांचा या कारवाईत महत्त्वाचा सहभाग होता. या तंत्रज्ञानामुळे लक्ष्यांची अचूक ओळख, त्यांचा मागोवा आणि नियंत्रित पद्धतीने हल्ला करणे शक्य झाले.
२३ मिनिटांत नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतीय सैन्याने अवघ्या २३ मिनिटांच्या कालावधीत नऊ उच्च-मूल्य दहशतवादी लक्ष्यांवर हल्ला करून ती उद्ध्वस्त केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. कारवाईदरम्यान एकही भारतीय लष्करी प्लॅटफॉर्म गमावला गेला नाही, असा दावाही करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या धमकीमुळे भारताची दहशतवादाविरोधातील कारवाई रोखली जाणार नाही, हा संदेश या कारवाईतून देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.


