वाळपई : तोणीर-काजरेधाट धबधब्यावर वास्को येथील एका विद्यार्थ्याचा काही दिवसांपूर्वी बुडून मृत्यू झाल्याने सत्तरी तालुक्यातील जलसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या दहा वर्षांत सत्तरीत धबधबे, नद्या आणि अन्य जलस्रोतांमध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या तब्बल ५२ घटनांची नोंद झाली आहे.
सत्तरीतील धबधबे, नद्या आणि घनदाट वनराई पावसाळ्यात हजारो पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र, खोल डोह, वेगवान पाण्याचा प्रवाह, निसरडे खडक, पाण्याची पातळी अचानक वाढणे तसेच प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्याचे धोके अनेक पर्यटकांच्या लक्षात येत नाहीत.
स्थानिक रहिवासी आणि उपलब्ध नोंदींनुसार, अनियंत्रित धबधबा पर्यटन, धोकादायक ठिकाणी होणारा अनिर्बंध प्रवेश, अपुरे धोक्याचे फलक व बॅरिकेडिंग, सुरक्षा कर्मचाऱ्यांची कमतरता आणि बचावकार्यासाठी अपुऱ्या पायाभूत सुविधा ही बुडून होणाऱ्या मृत्यूमागील प्रमुख कारणे आहेत.
सत्तरीतील अनेक धबधबे, नद्या आणि अन्य जलस्रोत लोकप्रिय पर्यटनस्थळे बनले आहेत. मात्र, त्यापैकी अनेक ठिकाणी अद्याप औपचारिक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नाही. पर्यटक धबधब्याच्या वरच्या भागात जातात, खोल डोहात पोहतात, खडकांवरून उड्या मारतात, धोकादायक ठिकाणी छायाचित्रे काढतात तसेच प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करतात. म्हादई नदी परिसर, हंगामी पावसाळी धबधबे आणि पाण्याने भरलेल्या बंद खाणी (क्वेरीज) येथेही बुडून मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. खोल डोह, पाण्याचा प्रचंड वेग, अचानक वाढणारा प्रवाह, निसरडे खडक, खोल खड्डे आणि पाण्याखालील अदृश्य अडथळे यामुळे या ठिकाणी धोका अधिक वाढतो.
वन अधिकाऱ्यांच्या मते, पावसाळ्यात अचानक येणारा वेगवान पाण्याचा प्रवाह (फ्लॅश फ्लो) हा मोठा धोका आहे. वरच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास काही मिनिटांतच नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे नदीपात्रात पोहणारे किंवा उभे असलेले पर्यटक अडकण्याची अथवा वाहून जाण्याची शक्यता असते.
मृतांमध्ये १६ ते ३० वयोगटातील तरुण अधिक
- बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये सत्तरीबाहेरील पर्यटकांची संख्या अधिक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. विशेषतः गोवा आणि अन्य राज्यांतील शहरी भागातून येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक भूभाग, पाण्याचा प्रवाह, खोल डोह आणि पावसाळ्यातील धोक्यांची पुरेशी माहिती नसते.
- मृतांमध्ये १६ ते ३० वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक असून, मनोरंजन, ट्रेकिंग, पोहणे आणि साहसी उपक्रमांसाठी धबधब्यांवर येणारे पर्यटक अधिक असुरक्षित ठरतात.
- सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि छायाचित्रांमुळेही पर्यटक धोकादायक ठिकाणांकडे आकर्षित होतात. काही पर्यटक मद्यपान करून पाण्यात उतरतात, इशारा सूचनांकडे दुर्लक्ष करतात आणि सुरक्षेच्या सल्ल्याचे पालन करत नाहीत, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे.
प्रवेशबंदी ठरते कुचकामी...
- सत्तरीमधील अनेक पंचायतींनी त्यांच्या अखत्यारितील धबधबे आणि नदी परिसरात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. अनेक ठिकाणी इशारा फलक, बॅनर आणि प्रवेशबंदीच्या सूचना लावण्यात आल्या आहेत. मात्र, सूचना फलकांची संख्या अपुरी असून अनेक पर्यटक प्रतिबंधित डोह आणि नदीपात्रात प्रवेश करत असल्याने नियमांची अंमलबजावणी करणे प्रशासनासाठी आव्हान ठरत आहे.
- अपुरे बॅरिकेडिंग, सुरक्षा कर्मचारी आणि वनरक्षकांची कमतरता, लाईफ जॅकेट, दोरखंड व अन्य बचाव साहित्याचा अभाव, कमकुवत दळणवळण व्यवस्था आणि पर्यटकांमध्ये सुरक्षेबाबत अपुरी जागरूकता यांसारख्या त्रुटींकडेही स्थानिकांनी लक्ष वेधले आहे.


