मडगाव: कोकणी भाषा मंडळातर्फे आयोजित 'शणै गोंयबाब कथामाळ' यंदा आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या कथामालेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शालेय स्तरावर सुमारे ६,००० तर केंद्रीय स्तरावर जवळपास १,५०० स्पर्धक सहभागी झाले आहेत.

या स्पर्धेची केंद्रीय फेरी ८ ऑगस्ट रोजी राज्यातील २० केंद्रांवर एकाच वेळी आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती मुख्य संयोजक रत्नमाला दिवकर यांनी दिली. ही कथामाला पेडणे, बार्देस, सत्तरी, डिचोली, फोंडा, वास्को, धारबांदोडा, पणजी, मडगाव, केपे, सांगे, माशेल, कुंकळ्ळी, काणकोण आणि शिरोडा येथे पार पडणार आहे.

ही स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटांत होईल. कथा केवळ कोकणी भाषेत (कोणत्याही बोली भाषेत) सांगावी लागेल. केंद्रीय फेरीतील पहिले दोन विजेते १६ ऑगस्ट रोजी मडगाव येथील शासकीय महाविद्यालयात होणाऱ्या जिल्हा व राज्यस्तरीय फेरीसाठी पात्र ठरतील. पारितोषिक वितरण समारंभाला '९२.७ बिग एफएम'चे प्रसिद्ध कथाकार नीलेश मिश्रा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच मंगळूर येथील 'दायजी डॉट कॉम' टीव्ही चॅनलवर या कथा प्रसारित केल्या जातील.


