उरी कोर्टाच्या आदेशानंतर तरुणाची मायदेशी रवानगी

श्रीनगर : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'स्नॅपचॅट'वर झालेल्या प्रेमापोटी पाकव्याप्त काश्मीरमधून नियंत्रण रेषा ओलांडून भारतात आलेल्या २२ वर्षीय झीशान अहमद मीर या तरुणाला अखेर कायदेशीर प्रक्रियेनंतर पाकिस्तानात परत पाठवण्यात आले आहे. उरी न्यायालयाने खटला बंद केल्यानंतर, शनिवारी (४ जुलै) दुपारी त्याला 'कमन अमन सेतू'वरून पाक लष्कराच्या ताब्यात देण्यात आले.
काश्मीरमधील मुझफ्फराबादचा रहिवासी असलेला झीशान आणि जम्मू-काश्मीरच्या उरी येथील रहिवासी इराम मजीद यांची स्नॅपचॅटवर ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. इरामला भेटण्याच्या ओढीने झीशानने कोणताही विचार न करता ३१ मे रोजी बेकायदेशीरपणे नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला. मात्र, उरी सेक्टरमधील सिलीकोट या अत्यंत संवेदनशील आणि कुंपण असलेल्या भागात लष्कराच्या १२ ग्रेनेडियर्सच्या जवानांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.

सुरुवातीला लष्कराने त्याला 'घुसखोर' म्हणून पकडले होते, परंतु कसून चौकशी केल्यावर त्याचा कोणताही देशद्रोही किंवा संशयास्पद हेतू नसल्याचे समोर आले. केवळ प्रेयसीला भेटण्यासाठी त्याने हे धाडस केले होते. लष्कराने त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांच्या हवाल्या केले. पोलिसांनी बेकायदेशीर घुसखोरीचा गुन्हा नोंदवून त्याला बारामुल्ला कारागृहात पाठवले. तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले, जे कोर्टाने मान्य करत खटला बंद केला आणि त्याच्या मायदेशी रवानगीचा मार्ग मोकळा केला. भारतीय लष्कराने त्याला संपूर्ण आदराने आणि मानवतावादी दृष्टिकोनातून वागणूक दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तुरुंगातून सुटका झाल्यानंतर शनिवारी झीशानला कमन पोस्टवर आणण्यात आले. तिथे त्याची प्रेयसी इराम, तिचे आई-वडील आणि बहिणींना त्याला शेवटचे भेटण्याची २-३ मिनिटांची परवानगी देण्यात आली. आम्हाला त्याला फक्त २ ते ३ मिनिटे भेटू दिले. तो काहीच बोलला नाही, फक्त सतत रडत होता, अशी भावनिक प्रतिक्रिया इरामने दिली. यापूर्वी सीमा हैदर आणि इक्रा जिवानी यांच्यासारख्या अनेक सीमापार प्रेम कहाण्या भारतात चर्चेत आल्या आहेत, ज्यात आता झीशानच्या या धाडसी पण अपूर्ण राहिलेल्या प्रेम कहाणीची भर पडली आहे.