पाकिस्तानचे अफगाणिस्तानवर हवाई हल्ले; ११ मुलांसह १३ जणांचा मृत्यू

तालिबानकडून प्रत्युत्तराचा इशारा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
8 hours ago
पाकिस्तानचे अफगाणिस्तानवर हवाई हल्ले; ११ मुलांसह १३ जणांचा मृत्यू

काबूल : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावाद पुन्हा एकदा चिघळला असून पाकिस्तानने बुधवारी अफगाणिस्तानातील काही भागांवर हवाई हल्ले केल्याचा दावा तालिबान सरकारने केला आहे. या हल्ल्यांमध्ये ११ मुलांसह १३ जणांचा मृत्यू झाला असून; १४ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर तालिबानने पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

अफगाणिस्तानच्या तालिबान-प्रशासित सरकारच्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या लष्कराने अफगाणिस्तानातील खोस्त, पक्तिका आणि कुनार प्रांतांमध्ये हवाई कारवाई केली. पाकिस्तानने या कारवाईत दहशतवादी तळ आणि अतिरेक्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. मात्र, अफगाणिस्तानने हा दावा फेटाळून लावत हल्ल्यांमध्ये नागरिकांची घरे उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले आहे.

११ मुलांसह १३ जणांचा मृत्यू

तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये ११ मुले, एक महिला आणि एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांनी या कारवाईचा निषेध करत याला "मानवताविरोधी गुन्हा आणि उघड आक्रमण" असे संबोधले.

सीमावादामुळे तणाव वाढला

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण आहेत. सीमेलगत वाढलेल्या दहशतवादी कारवायांमुळे दोन्ही देशांमध्ये वारंवार संघर्ष होत आहेत. फेब्रुवारीपासून दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात लष्करी कारवाया केल्याचे वृत्त आहे. या संघर्षात शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते.

यापूर्वीही पाकिस्तानने अफगाणिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केल्याचा दावा केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानने सीमापार कारवाई केल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती.

तालिबानचा इशारा

ताज्या हवाई हल्ल्यानंतर तालिबान सरकारने पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर झालेला हा हल्ला सहन केला जाणार नसल्याचे सांगत तालिबानने योग्य वेळी प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे.

या घटनेमुळे दक्षिण आशियातील सुरक्षेची परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली असून दोन्ही देशांतील वाढता संघर्ष व्यापक प्रादेशिक तणावाला कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा