खात्यात लाखो रुपये, बहिणीच्या कबरीला संरक्षण; मात्र मनात आजही धास्ती

बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत जाणाऱ्या जितू मुंडाची व्यथा

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
5 mins ago
खात्यात लाखो रुपये, बहिणीच्या कबरीला संरक्षण; मात्र मनात आजही धास्ती

भुवनेश्वर : ओडिशातील क्योंझार जिल्ह्यातील डायनाली गावात राहणारा जितू मुंडा गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाच्या चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्या बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत गेलेल्या या घटनेने प्रशासन आणि बँकिंग व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आणल्या. आजही गावातील अनेक लोक जितूला भेटण्यासाठी येतात आणि त्याला एकच प्रश्न विचारतात, ‘तू बहिणीचा सांगाडा बँकेत कसा नेलास?’ हा प्रश्न ऐकला की जितू काही अंतरावर असलेल्या बहिणीच्या समाधीकडे पाहत तिची माफी मागतो.

२७ एप्रिल रोजी जितू अनवाणी पायांनी सुमारे साडेतीन किलोमीटर चालत ओडिशा ग्रामीण बँकेच्या मल्लीपोसी शाखेत पोहोचला होता. त्याच्या खांद्यावर बहिण कलारा मुंडाचा सांगाडा होता. बँक अधिकाऱ्यांना तिचा मृत्यू झाल्याचा पुरावा दाखवण्यासाठी त्याने हा टोकाचा निर्णय घेतला होता. कारण कलाराच्या खात्यातील १९,३०० रुपये मिळवण्यासाठी त्याला अनेक महिन्यांपासून हेलपाटे मारावे लागत होते.

या घटनेमुळे राज्यभर संताप व्यक्त झाला. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या जिल्ह्यातच अशी घटना घडल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई केली. दोन दिवसांत कलाराचे मृत्यू प्रमाणपत्र तयार करण्यात आले. बँकेने व्याजासह १९,४०० रुपये परत दिले. जिल्हा प्रशासनाने रेड क्रॉस निधीतून ३० हजार रुपयांची मदत दिली. तसेच जितूचे नाव विविध सरकारी योजनांमध्ये नोंदवण्यात आले. त्याला सामाजिक सुरक्षा पेन्शन, स्वस्त धान्य योजना आणि इतर लाभ मिळू लागले.

पूर्वी अत्यंत गरिबीत जगणाऱ्या जितूच्या आयुष्यात या घटनेनंतर मोठा बदल झाला. लोकांकडून मदत म्हणून त्याच्या खात्यात आता १० लाखांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. आयुष्यात कधी चप्पल न घातलेल्या जितूकडे आता अनेक जोड चप्पला, लोखंडी खाट, पंखा, सायकल तसेच अनेक महिन्यांचा धान्यसाठा आहे. बहिणीची समाधीही आता सिमेंटची बांधण्यात आली आहे.

कलारा मुंडाने जवळपास चाळीस वर्षांपूर्वी पती आणि मुलगा गमावला होता. त्यानंतर ती माहेरी परतली आणि भाऊ जितूसोबत राहत होती. दोघांचा उदरनिर्वाह सरकारी योजनांवर चालत होता. कलाराला अंत्योदय अन्न योजना आणि विविध पेन्शन योजनांमधून आर्थिक मदत मिळत होती. मात्र जितूकडे कोणतेही वैध कागदपत्र नसल्याने तो कोणत्याही योजनेचा लाभ घेऊ शकत नव्हता. त्याचे आधार कार्ड २०१५ मध्ये हरवले होते.

कलाराच्या खात्यातील पैसे दोन वर्षांपूर्वी विकलेल्या म्हशींचे होते. गेल्या वर्षी ती गंभीर आजारी पडली आणि दोन महिने अंथरुणाला खिळून राहिली. त्या काळात जितू अनेकदा बँकेत गेला. पण खातेधारक स्वतः उपस्थित असणे आवश्यक असल्याचे सांगून त्याला परत पाठवण्यात आले. कलारा चालू शकत नसल्याचे सांगितल्यानंतरही अधिकाऱ्यांनी दुसरा कोणताही पर्याय सुचवला नाही.

२६ जानेवारीला कलाराचे निधन झाले. त्यानंतर मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जितूने अनेक प्रयत्न केले, पण सरकारी प्रक्रियेत तो अडकून पडला. प्रशासनानेही यामध्ये निष्काळजीपणा झाल्याचे मान्य केले. प्रमाणपत्र नसल्याने बँकेतून पैसे मिळत नव्हते. अखेर हताश झालेल्या जितूने बहिणीचा सांगाडा बाहेर काढून बँकेत नेण्याचा निर्णय घेतला.

बँकेत सांगाडा पाहताच एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून त्याला समजावले आणि सांगाडा पुन्हा दफन करण्यात येईल याची खात्री केली. सुरुवातीला बँकेने जितूवर आरोप केले, मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो अधिकाऱ्यांना विनवण्या करत असल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेनंतर समाजाच्या परंपरेनुसार जितूवर शुद्धीकरण विधी करण्यात आला. त्याने डोके मुंडन करून धार्मिक विधी पूर्ण केले. मात्र इतके सर्व घडूनही २७ एप्रिलचा दिवस तो विसरू शकत नाही. घरातील एका कोपऱ्याकडे पाहत तो आजही म्हणतो, इथे आम्ही दोघे मिळून स्वयंपाक करायचो. तिच्या आत्म्याला शांती मिळू दिली नाही, यासाठी मी तिची माफी मागतो.

हेही वाचा