विजय यांच्या पाठिशी दिल्लीतून खर्गे यांची ताकद

चेन्नई: तमिळनाडूच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा पेच आता सुटल्याची चिन्हे दिसत आहे. 'तमिळगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख आणि अभिनेता विजय यांनी बहुमतासाठी आवश्यक असलेला ११८ आमदारांचा आकडा अखेर जमवून आणला आहे. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी दोनवेळा स्पष्ट बहुमताअभावी विजय यांना परत पाठवले होते, मात्र आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्लीतून लावलेली ताकद आणि डाव्या पक्षांच्या संभाव्य पाठिंब्यामुळे विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग सुकर झाला आहे.

राजकीय गणितांचा विचार केला असता, टीव्हीकेकडे स्वतःचे १०८ आमदार आहेत. बहुमतासाठी त्यांना अजून १० आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसचे ५ आमदार यापूर्वीच विजय यांच्यासोबत आहेत. आता व्हीसीकेचे ४ आणि सीपीआय तसेच सीपीआय(एम) चे प्रत्येकी २ अशा एकूण १० आमदारांचा पाठिंबा मिळवण्यात टीव्हीकेला यश आले आहे. या घडामोडींमागे मल्लिकार्जुन खर्गे यांची महत्त्वाची भूमिका राहिली. खर्गे यांनी सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा यांच्याशी फोनवरून चर्चा करून, भाजपला मागच्या दाराने सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी 'टीव्हीके'च्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष सरकारला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. या आवाहनानंतर डाव्या पक्षांनी आपल्या स्थानिक मित्रपक्षांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत.

दुसरीकडे, राजभवनातील विलंबामुळे तामिळनाडूतील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. काँग्रेसने राज्यपालांविरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरू केले असून, अण्णा सलाई येथील निदर्शनांत काँग्रेस प्रभारी गिरीश चोडणकर यांनी राज्यपालांवर सडकून टीका केली. राज्यपाल हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इशाऱ्यावरून लोकशाही मूल्यांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप चोडणकर यांनी केला आहे. 'सर्वात मोठा पक्ष' असूनही विजय यांना संधी न देणे हे असंवैधानिक असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. या आंदोलनामुळे चेन्नईसह राज्यभरात तणावाचे वातावरण असून, राजभवनासमोर निदर्शने करणाऱ्या टीव्हीके समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत टीव्हीकेने आपली भूमिका अत्यंत आक्रमक ठेवली आहे. जर डीएमके आणि एआयएडीएमके या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांनी केवळ विजय यांना सत्तेपासून रोखण्यासाठी अनैतिक आघाडी केली, तर आपले सर्व १०८ आमदार राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जातील, असा इशारा टीव्हीकेने दिला आहे. अशा परिस्थितीत, राज्यपाल आता विजय यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी आमंत्रित करतात की पुन्हा एकदा तांत्रिक कायदे पुढे करतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एकूणच, थलपती विजय यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी आता केवळ औपचारिकता उरल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
