उपमुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला उधाण!

पाटणा: बिहारच्या राजकीय पटलावर आज एका नवीन युगाची नांदी झाली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सुपुत्र निशांत कुमार यांनी रविवारी अधिकृतपणे सत्तारूढ जनता दल (युनायटेड) म्हणजेच जदयूमध्ये प्रवेश केला. नितीश कुमार यांनी सक्रिय मुख्यमंत्रीपदाचा त्याग करून राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर, निशांत कुमार यांचा हा प्रवेश म्हणजे बिहारच्या भावी उपमुख्यमंत्रीपदाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, नितीश कुमार आपले पद सोडल्यानंतर पुढच्या महिन्यात भाजपच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारमध्ये निशांत कुमार यांना मोठी जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
आयुष्यभर घराणेशाहीच्या राजकारणाला कडाडून विरोध करणाऱ्या नितीश कुमार यांनी अखेर आपल्या समर्थकांच्या आग्रहाखातर आणि पक्षाच्या भविष्यासाठी निशांत कुमार यांना राजकारणात आणण्याचा निर्णय घेतला आहे. ५१ वर्षीय निशांत कुमार यांनी आपल्या पहिल्या जाहीर भाषणात वडिलांच्या निर्णयाचे समर्थन केले. माझे वडील नितीश कुमार यांनी राज्यसभेत जाण्याचा वैयक्तिक निर्णय घेतला असून आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे आहोत. त्यांच्या अनुपस्थितीत मी पक्षाची पूर्ण काळजी घेईन. ते आमचे मार्गदर्शक राहतील आणि आम्ही सर्व मिळून पक्ष मजबूत करून जनतेचा विश्वास संपादन करू, असा विश्वास निशांत यांनी यावेळी व्यक्त केला.
निशांत कुमार हे व्यवसायाने इंजिनीअर असून त्यांनी रांची येथील 'बीआयटी मेसरा'मधून बी.टेक. पदवी संपादन केली आहे. आतापर्यंत त्यांनी सक्रिय राजकारणापासून स्वतःला दूर ठेवले होते, परंतु राज्याच्या बदलत्या राजकीय समीकरणामुळे त्यांना मैदानात उतरावे लागले आहे. आगामी काळात भाजपच्या मुख्यमंत्रिपदाखालील सरकारमध्ये निशांत कुमार उपमुख्यमंत्री म्हणून दिसू शकतात. या सरकारमध्ये चिराग पासवान यांचा लोजपा (आर), जीतनराम मांझी यांचा 'हम' आणि उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा यांचाही सहभाग असेल.
दुसरीकडे, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) या घडामोडींवर तीव्र टीका केली आहे. आरजेडीचे खासदार मनोज झा यांनी नितीश कुमार यांच्या राज्यसभेतील स्थलांतराला 'राजकीय अपहरण' असे संबोधले आहे.नितीश कुमार यांनी ७५ व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाचा निरोप घेण्याचे संकेत दिल्याने आणि पुत्राला राजकारणात सक्रिय केल्याने बिहारमधील सत्तेचा केंद्रबिंदू आता बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.