
पणजी : अनेकदा थकवा किंवा गाढ झोप लागल्यामुळे माणूस घोरतो, असे मानून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. घोरणे ही एक सामान्य प्रक्रिया असल्याचे समजले जात असले, तरी वैद्यकीय दृष्टिकोनातून ही समस्या तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. संशोधनातून असे समोर आले आहे की, जे लोक झोपेत मोठ्याने घोरतात, त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता इतरांच्या तुलनेत किमान २३ टक्के अधिक असते. त्यामुळे या समस्येकडे केवळ एक सवय म्हणून न पाहता, त्यातील गांभीर्य ओळखणे आता काळाची गरज बनली आहे.
![]()
घोरण्याची समस्या प्रामुख्याने श्वसनसंस्थेशी निगडित असते. जेव्हा श्वसननलिकेमध्ये अडथळा निर्माण होतो, तेव्हा श्वास घेताना एक प्रकारचा कंप निर्माण होऊन आवाज येतो. याची अनेक कारणे असू शकतात. नाक चोंदणे, ॲलर्जी, घशातील टॉन्सिल्स वाढणे किंवा नाकाचे हाड वाकडे असणे यांसारख्या श्वसनसंस्थेच्या तक्रारींमुळे श्वास घेण्यास अडथळा येतो. याशिवाय, वाढलेले वजन हे देखील घोरण्याचे एक प्रमुख कारण आहे. मानेभोवती चरबीचे प्रमाण वाढल्यास झोपताना श्वसननलिकेवर दबाव येतो, परिणामी घोरण्याचा त्रास सुरू होतो.
चुकीच्या जीवनशैलीचाही यावर मोठा परिणाम होतो. जे लोक पाठीवर झोपतात, त्यांची जीभ गुरुत्वाकर्षणामुळे घशाच्या मागील बाजूला झुकते. यामुळे हवेचा मार्ग अरुंद होतो. तसेच झोपण्यापूर्वी धूम्रपान केल्याने श्वसननलिकेला सूज येते आणि श्वास घेताना त्रास होतो. अत्यंत थकवा असल्यास शरीराचे स्नायू जास्त सैल पडल्यानेही घोरण्याचा आवाज वाढतो. मात्र, यातील सर्वात गंभीर प्रकार म्हणजे 'स्लीप ॲप्निया'. यामध्ये झोपेत असताना काही सेकंदांसाठी श्वास पूर्णपणे थांबतो, जे हृदयासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
![]()
सततच्या घोरण्यामुळे शरीरातील रक्तदाब वाढतो, ज्याचा थेट परिणाम हृदयाच्या स्नायूंवर होतो. दीर्घकाळ ही समस्या राहिल्यास हृदयाचा आकार वाढणे किंवा हृदयाचे ठोके अनियमित होणे अशा समस्या उद्भवतात. इतकेच नव्हे, तर झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसभर थकवा जाणवणे, एकाग्रता कमी होणे, चिडचिड होणे आणि मधुमेहाचा धोका वाढणे अशा अनेक व्याधी जडू शकतात.

यावर उपाय म्हणून जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. पाठीवर झोपण्याऐवजी कुशीवर, विशेषतः डाव्या कुशीवर झोपल्यास श्वसन प्रक्रिया सुरळीत राहते. नियमित व्यायाम करून वजन नियंत्रणात ठेवणे आणि झोपताना डोक्याखाली मध्यम उंचीची उशी घेणे फायदेशीर ठरते. जर घोरण्याचा त्रास तीव्र असेल, तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. वेळीच घेतलेली काळजी तुम्हाला संभाव्य हृदयविकारापासून वाचवू शकते.
टीप : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. आरोग्याशी निगडीत कोणत्याही समस्या असल्यास तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून संकेचे निरसन करून घ्यावे.