‘विकसित भारत’साठी अध्यात्म, राष्ट्रसेवा, विकास यांचा समन्वय आवश्यक

पर्तगाळी मठाच्या ५५० वर्षपूर्ती सोहळ्यात पंतप्रधानांचे गौरवोद्गार

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
28th November, 06:22 pm
‘विकसित भारत’साठी अध्यात्म, राष्ट्रसेवा, विकास यांचा समन्वय आवश्यक

पणजी : ‘विकसित भारत’चे २०२७ सालापर्यंतचे स्वप्न साकार करण्यासाठी अध्यात्म, राष्ट्रसेवा आणि विकास या तिन्ही गोष्टींचा समन्वय असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पर्यटनाचा प्रमुख भाग असलेल्या गोवा राज्याची आणि आध्यात्मिक कार्य करणाऱ्या पर्तगाळी मठाची ‘विकसित भारत २०२७’च्या ध्येयात महत्त्वाची भूमिका राहील, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. पर्तगाळ जीवोत्तम मठाच्या ५५० व्या वर्षपूर्तीनिमित्त श्री रामाच्या ७७ फूट भव्य मूर्तीचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यात बोलताना पंतप्रधानांनी अध्यात्म, इतिहास, संस्कृती आणि विकास यावर आपले मत व्यक्त केले.




कोकणीतून भाषणाला सुरुवात

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात, ‘सगळ्या भक्तांक आनी अनुयायांक मायेमोगाचो नमस्कार’ या कोकणी वाक्याने केली. आध्यात्मिक कार्य करतानाच पर्तगाळ मठाने संस्कृतीचे संवर्धन केले. बदलत्या परिस्थितीत सेवा कार्य चालू ठेवताना मठाने आपली दिशा बदलली नाही, उलट लोकांना योग्य दिशा देण्याचे कार्य केले, अशा शब्दांत त्यांनी मठाच्या कार्याचे कौतुक केले.




समाजाला आणि राष्ट्राला योग्य दिशा देण्यासाठी अध्यात्म, इतिहास आणि संस्कृतीची आवश्यकता असते. भक्ती आणि शिस्तीमुळे एक सामूहिक ऊर्जा तयार होत असते. लोकांची मने जोडताना परंपरा आणि आधुनिकता यामधील पर्तगाळ मठ हा एक महत्त्वाचा दुवा राहिलेला आहे, असे त्यांनी सांगितले.




विकसित भारतासाठी आवाहन

विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाने पर्यावरणासह पाण्याचे संवर्धन करायला हवे. तसेच सेंद्रिय शेतीसोबत सशक्त अशी जीवनशैली आत्मसात करायला हवी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले. या सोहळ्याला राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत, मठाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, श्रीपाद वडेर स्वामी व इतर मान्यवर उपस्थित होते.




भविष्यात महत्त्वाचे पर्यटन स्थळ

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘विकसित गोवा २०३७’चे उद्दिष्ट पूर्ण करताना आध्यात्मिक विकासही महत्त्वाचा घटक असल्याचे स्पष्ट केले. पर्तगाळ मठ हे भविष्यात महत्त्वाचे पर्यटन स्थळ बनेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी, मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी स्वागतपर भाषण केले, तर विद्याधीराज तीर्थ वडेर स्वामी यांनी मठाच्या कार्याची माहिती दिली.




पाचशे पन्नास रुपयांचे नाणे जारी

मठाच्या ५५० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी ५५० रुपयांच्या स्मरणार्थ नाण्याचे लोकार्पण केले. या नाण्याचे वजन ३५ ग्रॅम असून, त्यात ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के जस्त आणि ५ टक्के निकेल या धातूंचा समावेश आहे.




हेही वाचा