खानापूर : अल्पवयीन मुलींच्या तस्करीच्या शक्यतेने कर्नाटक प्रशासन सतर्क

एजंट सक्रिय : जोयडा-खानापूर सीमाभागात पोलिसांकडून सर्वे

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
2 hours ago
खानापूर : अल्पवयीन मुलींच्या तस्करीच्या शक्यतेने कर्नाटक प्रशासन सतर्क

जोयडा : जोयडा आणि खानापूर तालुक्याच्या सीमावर्ती गावांमध्ये अल्पवयीन मुलींना विविध आमिषे दाखवून परराज्यात कामासाठी पाठवण्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, या भागात दलालांचे एक मोठे जाळे सक्रिय असून ते स्थानिक नागरिकांनाच एजंट म्हणून वापरत आहेत. हे एजंट मुलींच्या पालकांना मोठ्या पगाराचे आश्वासन देऊन मुलींना बाहेरच्या राज्यात पाठवत आहेत. प्रत्येक मुलीवर १२ हजार रुपयांपर्यंत कमिशन मिळत असल्याची चर्चा असल्याने हे मानवी तस्करीचे जाळे असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.
मागील काही आठवड्यांत लोंढा आणि रामनगर पोलीस स्थानक हद्दीतील अनेक गावांमधून अल्पवयीन मुली परराज्यात पाठवण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. येथील बहुतेक मुलींना प्रथम गोव्यात घरकामासाठी नेले जाते, त्यानंतर इतर राज्यातील मोठ्या शहरांमध्ये ‘अधिक कमाई’च्या आमिषाखाली विविध कामांसाठी पुरवले जात असल्याची चर्चा आहे.

सीमावर्ती काही गावांतील अल्पवयीन मुलींनी अचानक शाळा सोडून दिल्याने शिक्षकांना शंका आली. त्यांनी गावात जाऊन चौकशी केली असता, त्या मुलींना पालकांनीच कामासाठी बाहेरच्या राज्यात पाठवल्याचे स्पष्ट झाले. यामुळे अवैधपणे मुलींची वाहतूक (तस्करी) होत असल्याची खात्री पटली आहे.हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रामनगर आणि लोंढा पोलीस, पंचायत अधिकारी आणि शाळा प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. दीर्घकाळापासून शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी घेऊन पोलीस आणि पंचायत अधिकारी मुलींच्या घरी भेट देत आहेत.
रामनगर पोलिसांनी लोंढा पोलीस ठाण्यालाही काही मुलींची माहिती दिली असून, दोन्ही ठिकाणी कसून तपास सुरू आहे. स्थानिकांनी मागणी केली आहे की, अल्पवयीन मुलींची परराज्यात तस्करी करणाऱ्या या दलालांच्या साखळीचा पूर्णपणे शोध घेऊन ती उद्धवस्त करणे आवश्यक आहे.
एजंटांचे जाळे सक्रिय
या एजंटांच्या साखळीत पूर्वी गोव्यात घरकामासाठी गेलेल्या काही महिलांचा आणि स्थानिक पालकांचाही गैरवापर होत असल्याचे उघड झाले आहे. ‘मुलगी शिकून काय पैसे देणार?’ असे सांगत पालकांना मुलींना बाहेर पाठवण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. पैशाच्या आमिषाला बळी पडून पालक स्वतःच मुलींना एजंटकडे सोपवत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.      

हेही वाचा