काँग्रेसला रवी नाईकांचा विसर!

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा आरोप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th October, 11:59 pm
काँग्रेसला रवी नाईकांचा विसर!

पणजी : माजी मुख्यमंत्री दिवंगत रवी नाईक यांचे निधन होऊन तेरा दिवसही झाले नसताना काँग्रेस पक्षाला उमेदवार शोधण्याची घाई झाली आहे, यातून काँग्रेसला सत्तेची किती हाव आहे हेच दिसून येते, असा थेट निशाणा भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी साधला. बेतोडा येथे आयोजित दिवंगत रवी नाईक यांच्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते.
अखिल भारतीय काँग्रेस समिती, गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे लोकसभा खासदार, आमदार आणि माजी आमदार यांसह अनेक वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी, रवी नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकही शोक संदेश सोशल मीडियावर पोस्ट केला नाही. एवढेच नव्हे तर, काँग्रेसने कोणताही श्रद्धांजली किंवा शोकसभा कार्यक्रमसुद्धा आयोजित केला नाही.
काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज
स्व. रवी नाईक यांनी ३० वर्षांहून अधिक काळ काँग्रेस पक्षाची सेवा केली. २००५ मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून पक्ष मोठा केला होता. अशा नेत्याला काँग्रेसने विसरणे दुर्दैवी आहे. ‘आजच्या घडीला काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज आहे,’ असा टोलाही दामू नाईक यांनी यावेळी लगावला. 


श्रद्धांजली सभेला राजकीय मंचाचे स्वरूप देणे धक्कादायक : पणजीकर
पणजी : माजी मुख्यमंत्री दिवंगत रवी नाईक यांच्या श्रद्धांजली सभेला भाजपने राजकीय मंचाचे स्वरूप देणे अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणे आहे, अशी टीका गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यावर केली आहे.
स्व. रवी नाईक यांच्या आदरांजली कार्यक्रमाला ‍काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस, आमदार एल्टन डिकोस्टा, अॅड. कार्लुस फेरेरा, माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांसह पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केलेले भावपूर्ण श्रद्धांजली संदेश सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडियावर आजही उपलब्ध असल्याचा खुलासा पणजीकर यांनी केला. यावेळी पणजीकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांचे वर्तन 'असंवेदनशील, अहंकारी आणि मानवी भावनांपासून दुरावलेले' असल्याचे सांगत भाजपच्या राजकारणावर कठोर टीका केली.

ज्या कार्यक्रमात दिवंगत नेत्याच्या स्मृतींना आदरांजली अर्पण व्हायला हवी होती, त्या ठिकाणी दामू नाईक यांनी कार्यक्रमाचे गांभीर्य कलंकित करून केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्याचा उपयोग केला.

- अमरनाथ पणजीकर, अध्यक्ष, गोवा प्रदेश काँग्रेस समिती माध्यम विभाग    

हेही वाचा