'कूळ, मुंडकारांसाठी कार्य करून रवींनी वारसा निर्माण केला' : देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना मान्यवरांची श्रद्धांजली

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
'कूळ, मुंडकारांसाठी कार्य करून रवींनी वारसा निर्माण केला' : देवेंद्र फडणवीस

पणजी: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना श्रद्धांजली वाहताना, 'जे का रंजले, गांजले त्यासी म्हणे जो आपुले...' या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा संदर्भ देत रवी नाईक यांनी तळागाळातील आणि आवाज नसलेल्या सामान्य माणसांसाठी कार्य करून कूळ आणि मुंडकारांसाठी वारसा निर्माण केला, असे गौरवपूर्ण उद्गार काढले.




माजी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री रवी नाईक यांचे मंगळवारी १४ ऑक्टोबर रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी गोवा सरकारतर्फे आज कला अकादमीत शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासह अनेक मंत्री आणि आमदार उपस्थित होते.




फडणवीस म्हणाले: 'गृहमंत्री म्हणून कणखर भूमिका, कृषीमंत्री म्हणून संवेदनशीलता'

देवेंद्र फडणवीस यांनी रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन महत्त्वाच्या बाजू अधोरेखित केल्या. ते म्हणाले, "गृहमंत्री म्हणून घेतलेली कणखर भूमिका आणि कृषीमंत्री म्हणून जपलेली संवेदनशीलता या रवी नाईक यांच्या दोन बाजू जनतेच्या नेहमीच लक्षात राहतील. त्यांनी तयार केलेला वारसा चिरकाल टिकेल. रवी नाईक हे उत्तम व्हॉलीबॉलपटू होते आणि ती खिलाडूवृत्ती त्यांनी राजकारणातही कायम ठेवली होती. ते आयुष्यात अनेकदा जिंकले आणि हरलेही, पण त्यांनी आपली ही खिलाडूवृत्ती कधी सोडली नाही. त्यांनी आयुष्यात मोठा संघर्ष केला, पण व्यक्तिगत कोणाचा द्वेष केला नाही. ते समाजातील दबलेल्या, पिचलेल्या आणि वंचित घटकांचा आवाज बनले.



'तपोभूमी रवींमुळेच साकारली': ब्रह्मेशानंद स्वामी

कुंडई येथील तपोभूमीचे श्री ब्रह्मेशानंद महाराज यांनी रवी नाईक यांच्या योगदानाची आठवण करून दिली. ते म्हणाले की, श्री ब्रह्मानंद स्वामींना दिलेला शब्द रवी नाईक यांनी पाळला आणि त्यामुळेच कुंडईतील तपोभूमीचे स्वप्न साकार झाले. "ते काही देव देव करणारे नव्हते, पण जे देवाला मानणारे आहेत, त्यांच्या सर्वांसाठी काम करणारा हा नेता होता," असे गौरवोद्गार त्यांनी काढले..



बहुजन समाजाचे कैवारी आणि उत्तम प्रशासक

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रवी नाईक यांना बहुजन समाजाचे कैवारी संबोधले. ते म्हणाले की, "सर्व समाजाला एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न सदैव स्मरणात राहणार आहे. कुळ-मुंडकार असो किंवा कृषी क्षेत्र, त्यांचे योगदान मोठे आहे. राज्यातील तरुणांसाठी ते एक प्रेरणास्थान होते.".



'लोकांची पारख आणि सामान्यज्ञान वाखाणण्याजोगे' : उद्योजक अवधूत तिंबलो यांचा रवी नाईक यांना सलाम

 उद्योजक अवधूत तिंबलो यांनी रवी नाईक यांच्यातील व्यक्ती आणि नेतृत्वाच्या खास गुणांचे यावेळी स्मरण केले. तिंबलो यांनी सांगितले की, रवी नाईक यांच्याकडे लोकांना ओळखण्याचा (पारख) एक गूण होता, तसेच त्यांचे सामान्यज्ञानही अतिशय वाखाणण्याजोगे होते. "ते मला नेहमी 'पात्राव' म्हणूनच हाक मारायचे," अशी आठवण सांगून तिंबलो यांनी नाईक यांच्या आपुलकीच्या स्वभावाला स्पर्श केला.

रवी नाईक यांची कार्यशैली लोकांची मने जिंकणारी होती. ते खांद्यावर हात ठेवून लोकांना आपलेसे करत. याच आपुलकीने त्यांनी गोव्यासाठी आणि समाजासाठी मोठे योगदान दिले, असे तिंबलो यांनी नमूद केले.

वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, भाऊसाहेब बांदोडकर, शशिकला काकोडकर यांसारख्या नेत्यांच्या पंक्तीत रवी नाईक यांचे नाव आहे. "नेतृत्व कसे असावे? लोकांना कसे संघटित करावे? हे रवी नाईक यांनी दाखवून दिले," असे ढवळीकर म्हणाले. 

भाऊसाहेबांनंतर रवीच बहुजन समाजाचे नेते : अॅड. रमाकांत खलप 

भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानंतर रवी नाईक हेच खऱ्या अर्थान बहुजन समाजाचे नेते होते. कार्यक्रमात किंवा आंदोलनात माझे नाव पुढे असायचे मात्र खरे सेनापती रवीच असायचे. महाराष्ट्रवाद संपला असला तरी संस्कृती, भाषेच्या आधारे गोमंतक व महाराष्ट्र यांचे मनोमीलन होणे आवश्यक आहे, असे अॅड. रमाकांत खलप म्हणाले.


यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद तानवडे, सभापती गणेश गावकर, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रवी नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली.