एक किलो दागिन्यांसह २ लाख केले होते लंपास
पणजी : नागाळी-दोनापावला येथील प्रसिद्ध उद्योजकाच्या बंगल्यावर १९ एप्रिल रोजी रात्री दरोडेखोरांनी सुमारे एक किलो दागिन्यांसह २ लाख रुपयांची रोख रक्कम पळवून नेली होती. या घटनेला तीन महिने उलटले. तरी या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. मात्र, या प्रकरणाचा वेगवेगळ्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू अाहे.
प्रसिद्ध उद्योजक जयप्रकाश धेंपो यांच्या बंगल्यावर १९ एप्रिल रोजी दरोडेखोरांनी रात्री १२ ते पहाटे ४ या दरम्यान दरोडा टाकला होता. चोरांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती. दहशत निर्माण करण्यासाठी सुरक्षा रक्षकाचा कान कापला होता. नंतर बंगल्यात प्रवेश केला. घरात फक्त वृद्ध दाम्पत्यच होते. दरोडेखोरांनी त्यांना बेडरूममध्ये पलंगाला बांधून ठेवले आणि घरात लूट केली. बंगल्यातून जाताना त्यांनी सीसीटीव्ही यंत्रणा नेली होती. २० एप्रिल रोजी सकाळी मोलकरीण बंगल्यावर पोहोचल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, फॉरेन्सिक तज्ज्ञांकडूनही धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. दरम्यान, या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी सुरुवातीला पाच पथके तयार करून तपास सुरू केला. याच दरम्यान प्राथमिक चौकशीत सुरक्षा रक्षकाने दिलेल्या माहितीत विसंगती आढळली होती. इतरांच्या चौकशीतून दरोडेखोर पहाटे ५.३० वाजण्याच्या दरम्यान बंगल्यातून बाहेर पडल्याचे समोर आले. घटनेचा कालावधी चुकीचा दिल्यामुळे सुरुवातीला तपासाची दिशा चुकली. त्यामुळे चोरांना राज्याबाहेर जाण्यास मोकळीक मिळाली.
धागेदोरे पोलिसांच्या हाती
पोलिसांना तांत्रिक आणि फाॅरेन्सिक तज्ज्ञांकडून काही संशयितांचे धागेदोरेही हाती लागले आहेत. त्यात आंतरराज्य टोळीच्या संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार, तपास केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.