साहित्यविश्वात मानाचा समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्काराने यंदा गोव्याचे नाव उंचावले आहे. लेखिका नयना आडारकर आणि लेखिका ग्लिनिस डायस यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला असून, त्यांच्या या यशाने साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल आणि त्यांच्या साहित्य प्रवासाविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद…
बहुमान बालसाहित्याचा
शक्त आसली म्हूण
कोण व्हड जायना
ते शक्तीक जो मेरेन
बऱ्या कामाक लायना
आपल्या कवितेतून जीवनाप्रतीचा बोध देणाऱ्या नयनाताई आडारकर, लहान मुलांच्या बालविश्वात सफर करत साहित्यविश्वात मानाचा समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार २०२५ च्या मानकरी ठरल्या आहेत. गोव्याच्या साहित्य परंपरेत मानाचा तुरा खोवणारे नाव ठरलेल्या नयना आडारकर यांना त्यांच्या 'बेलाबायचो शंकर आनी हेर काणयो' या पुस्तकासाठी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या या पुरस्काराबद्दल आणि साहित्यिक प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी खास संवाद साधला.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया विचारताच नयनाताईंच्या बोलण्यातून समाधान उमटले. त्या म्हणाल्या, "माझ्यासाठी हा पुरस्कार अनपेक्षित सुखद धक्का होता. पण तो सुखद असल्याने फार बरे वाटले." त्यांच्या लेखणीतून नेहमीच वाचकांना आनंद देणाऱ्या नयनाताईंना मिळालेला हा सन्मान त्यांच्यासाठीही तितकाच आनंदाचा क्षण होता.
नयनाताईंनी त्यांच्या पुरस्कार विजेत्या पुस्तकाची, 'बेलाबायचो शंकर आनी हेर काणयो' ची कल्पना कशी सुचली हे सांगितले. त्या म्हणाल्या, "बालपणात माझ्याकडून तसेच इतरांकडून घडलेल्या काही मनोरंजक घटना मी माझ्या मुलांना रंगवून सांगत असे. मुलांना त्या ऐकायला फार आवडायच्या. हा प्रयोग मी माझ्या समवयस्क लोकांबरोबरही केला, तेव्हा मला जाणवलं की, ह्या गोष्टींत त्यांना 'थ्रिल' अनुभवायला मिळते. त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे त्यातल्या निवडक घटना घेऊन ह्या पुस्तकांतली एक गोष्ट घडली. दुसऱ्या इतर गोष्टी ह्या हल्लीच्या काळात किशोर वयातील मुलांना अनुभवास येणाऱ्या कित्येक प्रसंगांची सांगड घालून तयार केल्या आहेत."
बालसाहित्यातील योगदान आणि कवितेची ओढ नयनाताईंनी कोंकणी साहित्य आणि विशेषतः बालसाहित्यात मोठे योगदान दिले आहे. बालसाहित्य लिहिण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली, यावर त्यांनी प्रकाश टाकला. "आजीकडून गोष्टी ऐकणे आणि त्या हावभावासहित सादर करणे ही माझी बालपणापासूनची आवड. लिहिती झाल्यावर ‘भुरग्यांचो राजहंस’ साठी काही गोष्टी लिहिल्या. नंतर ‘हरिप्रकाशन’ ह्या संस्थेने माझी लागोपाठ नऊ पुस्तके प्रसिद्ध करून माझ्यासाठी बालसाहित्याचे दालन उघडले." पुढे त्या सांगतात, गोव्यातल्या एका कोंकणी दैनिकात असताना मुलांसाठी सातत्याने लिहिणे आणि देशी-विदेशी साहित्याचे अनुवाद केले गेले. कोंकणी भाषा मंडळाच्या वतीने मुलांसाठी शैक्षणिक साहित्य, गीतलेखन हातून घडले. राजहंस प्रकाशनातर्फेही पुस्तके प्रसिद्ध झाली. सगळी मिळून ३३ बालसाहित्याची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत." हे त्यांच्या बालसाहित्यातील अफाट योगदानाचे द्योतक आहे.
बालपणीची कोणती गोष्ट किंवा पुस्तक आवडलं होतं आणि त्याचा त्यांच्या लेखनावर परिणाम झाला का, असे विचारले असता त्या आठवणीत रमल्या. "अभ्यासाव्यतिरिक्त माझे वाचनातले पहिले पुस्तक मला बाबांनी भेट दिले. 'शेंवतीचे फूल'. ते पुस्तक त्याच्या कव्हरसहित माझ्या लक्षात राहिले आहे. चांदोबा व इतर गोष्टींची पुस्तके, तसेच आई, आजीने सांगितलेल्या गोष्टी, मी मुलांना सांगितलेल्या गोष्टींनी मला लिहिण्यास प्रवृत्त केले." कविता, कथा, ललित निबंध, नाटक आणि बालसाहित्य अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये लेखन करणाऱ्या नयनाताईंना कोणता प्रकार सर्वात जवळचा वाटतो, या प्रश्नावर त्या लगेच म्हणाल्या, "कविता. त्या माझ्या सगळ्या भावभावनांशी निगडित आहेत. बाकी साहित्यप्रकार लिहिण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. पण कविता काम करता करता आली तर छोट्याशा कागदावर तिला उतरवून घेण्यास सोपे पडते." याचबरोबर, बालसाहित्य निर्मिती ही सर्वात कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले.
कोंकणी बालसाहित्याचे
भविष्य आणि वाचकांना संदेश
कोंकणी बालसाहित्याच्या वर्तमान आणि भविष्याकडे त्या कशा पाहतात, यावर त्यांनी आशावादी दृष्टिकोन व्यक्त केला. "पूर्वी पारंपरिक पद्धतीने बालसाहित्य लिहिले जायचे. गोष्टींच्या शेवटी 'मोरल ऑफ द स्टोरी' यायची. आता कोंकणी बालसाहित्याने नवीन वळण घेतले आहे. बालवाचकांची वयमर्यादा, त्यांची समज, त्यांचे विचार, त्यांना भेडसावणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्यांचा विचार करून साहित्यनिर्मिती करणे काळानुसार किती गरजेचे आहे, याचे प्रशिक्षण कोंकणी भाषा मंडळाने राष्ट्रीय पातळीवर कार्यशाळा घेऊन लेखकांना दिले आहे. कोंकणी बालसाहित्याचे भविष्य मला तरी उज्ज्वल दिसते."
साहित्य अकादमी पुरस्कारामुळे पुढील लेखन प्रवासात काही बदल होतील का, यावर नयनाताईंचा विचार स्पष्ट आहे. "साहित्यात बदल घडवण्यासाठी पुरस्काराची गरज नसते. पुरस्कार एक कौतुकाची थाप तुमच्या कार्याला. लेखकाने सदैव जागृत राहावे. समाज, माणसे आणि इतर गोष्टींचे भान ठेवावे आणि सातत्य राखावे हे साहित्यिकाचे कार्य. त्याने हे कार्य प्रामाणिकपणे केले पाहिजे."
शेवटी, त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल आपल्या वाचकांना आणि हितचिंतकांना काही संदेश देऊ इच्छिता का, असे विचारले असता, त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. "वाचनाने अनेकांना समृद्ध केले आहे. स्वतःमधला आत्मविश्वास जागवायचे काम केले आहे. मी माझ्या हितचिंतकांची, वाचकांची ऋणी आहे. तीच माझी प्रेरणास्थाने. त्यांनी अशीच प्रेरणा देत राहावे, अशी नम्र विनंती."
नयना आडारकर यांच्या या यशाने कोंकणी साहित्य अधिक समृद्ध झाले आहे आणि त्यांच्या पुढील लेखनासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा!