रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी येथे रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात खासगी ट्रॅव्हल्समधील ३० शिक्षक जखमी झाले. सीएनजी गॅस वाहून नेणाऱ्या टँकरने मिनी बसला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. धडक एवढी जबरदस्त होती की बस रस्त्याच्या बाजूला जाऊन सुमारे वीस फूट खाली कोसळली.
धडकेनंतर टँकरमधून सीएनजी गळती झाली आणि गॅस हवेत पसरून पेट घेतल्याने आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली. आगीच्या झळा इतक्या तीव्र होत्या की रस्त्यालगत उभ्या असलेल्या दोन दुचाकी, एक रिक्षा जळून खाक झाल्या, तर एक म्हैस गंभीररित्या होरपळली. सुदैवाने जवळच्या घरातील रहिवाशांनी वेळेत बाहेर पडून जीव वाचवला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि वाहतूक विभाग घटनास्थळी पोहोचले. गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढून तातडीने रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे पाच तास ठप्प झाली होती. सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.
या ट्रॅव्हल्समधील शिक्षक रत्नागिरीत प्रशिक्षणासाठी येत होते. काही जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली. रेस्क्यू ऑपरेशनसाठी प्रशासन, अग्निशमन दल आणि वाहतूक पोलीस युद्धपातळीवर काम करत आहेत. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांची चौकशी सुरू आहे. टँकर चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.