रोहित शर्मा-विराट कोहली यांची उणीव भासणार

कसोटी कर्णधार शुभमन गिल : इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
05th June, 11:37 pm
रोहित शर्मा-विराट कोहली यांची उणीव भासणार

मुंबई : कसोटी क्रिकेटमधून रोहित शर्मा आणि विराट कोहलीने घेतलेली निवृत्ती. या दोघांनी दीर्घ काळ भारतीय संघाला अनेक कसोटी विजय मिळवून दिले. त्यांच्या अनुपस्थितीची भरपाई करणे सोपे नसेल, असे स्पष्ट मत भारतीय संघाचा नवनियुक्त कसोटी कर्णधार शुभमन गिलने मांडले. प्रत्येक दौऱ्यावर जिंकण्याचा दबाव असतो. विराट आणि रोहित यांनी भारतीय क्रिकेटमध्ये अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवाची उणीव नक्कीच भासणार आहे. मात्र आम्हाला दबावाची सवय आहे आणि आमचा आत्मविश्वास जबरदस्त आहे, असे गिल म्हणाला.
आयपीएल २०२५ च्या यशस्वी समारोपानंतर आता भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. २० जूनपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ लवकरच इंग्लंडकडे रवाना होणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नव्या कर्णधार शुबमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये गिलने माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याबद्दल भावनिक प्रतिक्रिया दिली.
गिलच्या नेतृत्वाखाली एक ताजेतवाना आणि संतुलित संघ निवडण्यात आला आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंच्या संमिश्रतेमुळे हा दौरा अधिक उत्साही आणि स्पर्धात्मक ठरण्याची शक्यता आहे.
भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी)च्या आयपीएल विजयाच्या जल्लोषासाठी आयोजित करण्यात आलेल्या रोड शोवर कठोर टीका केली आहे. या रोड शोदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ चाहत्यांचा मृत्यू झाला होता.
गंभीर हे कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत दोन वेळा आयपीएल विजेता ठरले आहेत आणि भारताच्या २००७ टी-२० विश्वचषक विजयी मोहिमेचा भागही होते. त्यांनी या पार्श्वभूमीवर सर्वांना ‘जबाबदार नागरिक’ होण्याचे आवाहन केले आणि जर लोक अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी पूर्णतः तयार नसतील, तर असे कार्यक्रम टाळावेत, असे स्पष्टपणे सांगितले.
इंग्लंड दौऱ्याच्या आधी पत्रकार परिषदेत गंभीर म्हणाले, मी कधीच रोड शोच्या बाजूने नव्हतो. अगदी २००७ मध्येही नव्हतो. अशा गोष्टी बंद दरवाजाआड किंवा स्टेडियममध्येच कराव्यात. मला आशा आहे की भविष्यात अशी दुर्दैवी घटना पुन्हा घडणार नाही. गंभीर यांनी यामध्ये नेमके कोण दोषी आहे किंवा चाहत्यांचा स्वभाव गेल्या काही वर्षांत बदलला आहे का, यावर कोणतीही थेट टिप्पणी केली नाही.
ते पुढे म्हणाले, आपण प्रत्येक बाबतीत जबाबदार नागरिक असण्याची गरज आहे. मग आपण फ्रँचायझी असो किंवा नसो. जर आपण रोड शोसाठी तयार नव्हतो, तर तो करूच नये. आपण ११ लोकांचा जीव गमावू शकत नाही.
दरम्यान गौतम गंभीर यांनी कसोटी फलंदाज करुण नायरबाबत मोठे वक्तव्य केले. त्यांनी म्हटले आहे की, इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेत करुण उत्तम कामगिरी करेल, याबाबत त्यांना पूर्ण विश्वास आहे. करुण नायरची इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या १८ सदस्यीय संघात निवड करण्यात आली आहे.
करुण नायरने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना मार्च २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. संघातून दीर्घ काळ दूर राहिल्यानंतर आता त्याला पुन्हा एकदा संधी मिळाली असून, त्याच्या पुनरागमनामुळे त्याच्या चाहत्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर उत्साह पाहायला मिळत आहे.
द्विशतकाने निवडीचा दावा भक्कम
करुण नायरने अलीकडेच इंडिया ए संघाकडून खेळताना इंग्लंड लॉयन्सविरुद्ध अनौपचारिक कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. या शानदार कामगिरीमुळे त्याने मुख्य संघात निवडीसाठी आपला दावा भक्कम केला. गौतम गंभीर यांनीही नायरच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.
माध्यमांशी बोलताना गंभीर म्हणाले, करुण नायरने आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे की तो कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी पूर्णतः तयार आहे. मला विश्वास आहे की तो इंग्लंडमधील कठीण परिस्थितींमध्ये चांगली कामगिरी करेल आणि संघासाठी उपयोगी ठरेल.
करुण नायरसारखा अनुभवी फलंदाज संघात परतल्यामुळे आगामी इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाच्या फलंदाजी विभागाला चांगली मजबुती मिळेल, अशी अपेक्षा क्रिकेट तज्ज्ञांकडूनही व्यक्त केली जात आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह किती सामने खेळणार, यावर गंभीर म्हणाले, आपण अजून हे ठरवलेले नाही की जसप्रीत बुमराह नेमके कोणते तीन कसोटी सामने खेळेल. ही निवड मुख्यतः मालिकेच्या निकालांवर आणि तिच्या दिशा कशा जातात यावर अवलंबून असेल.
गंभीर यांनी पुढे सांगितले की, भारतीय संघाकडे पुरेसे अशा दर्जाचे गोलंदाज आहेत जे कोणत्याही परिस्थितीत टेस्ट सामना जिंकू शकतात. जसप्रीत बुमराहसारखा खेळाडू संघात असणे हे आमच्यासाठी एक खास अनुभव असेल. त्याने किती सामने खेळले हे पाहणे रंजक ठरेल. तसेच त्यांनी हेही मान्य केले की, बुमराहची जागा घेणे सोपे नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यानही मी सांगितले होते की, बुमराहसारख्या गोलंदाजाची जागा घेणे अवघड आहे. पण आमच्याकडे असे गोलंदाज आहेत जे सक्षम आहेत आणि गरजेनुसार जबाबदारी पार पाडू शकतात.
‘क्लीन स्लेट’ रणनीतीवर गंभीर यांचे मत
गंभीर यांनी आपल्या ‘क्लीन स्लेट’ म्हणजेच नव्या सुरुवातीच्या दृष्टिकोनावर विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, आम्ही एका चांगल्या टप्प्यावर आहोत. सर्व खेळाडू उत्साहित आहेत. देशासाठी काहीतरी खास करण्याची ही आणखी एक संधी आहे. जुनी कामगिरी काय होती याला फारसा अर्थ नाही, कारण ही एक नवी सुरुवात आहे. आमच्याकडे अनेक जबरदस्त खेळाडू आहेत. गंभीर यांच्या या विधानातून स्पष्ट होते की ते जुना इतिहास मागे टाकून संघात असलेल्या नव्या आणि अनुभवी प्रतिभावान खेळाडूंवर विश्वास ठेवत नवीन पर्व सुरू करत आहेत. भारताचा हा इंग्लंड दौरा त्यांच्या दृष्टिकोनासाठी आणि नव्या नेतृत्त्वाच्या यशासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी: २० ते २४ जून – हेडिंग्ले, लीड्स
दुसरी कसोटी: २ ते ६ जुलै – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
तिसरी कसोटी: १० ते १४ जुलै – लॉर्ड्स, लंडन
चौथी कसोटी: २३ ते २७ जुलै – ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी: ३१ जुलै ते ४ ऑगस्ट – द ओव्हल, लंडन
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), के. एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदिप सिंग, आकाश दीप, कुलदीप यादव