डॉ. प्रमोद सावंत यांची उपस्थिती
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज नवी दिल्ली येथे सुशासनाच्या मुद्द्यांवर एक दिवसभर चालणाऱ्या विचारमंथन सत्रात सहभागी होणार आहेत. हाती आलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील आणि भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील या चर्चेत सहभागी होतील.
एनडीए शासित सर्व २० सरकारांचे २० मुख्यमंत्री आणि १८ उपमुख्यमंत्री आज दिल्लीत सुशासनाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील. भाजपच्या सुशासन विभागाने आयोजित केलेल्या या बैठकीत दोन ठराव देखील मंजूर केले जातील. पहिल्या ठरावात ते ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय संरक्षण दलांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतील आणि दुसऱ्या ठरावात ते जातिनिहाय जनगणनेबाबत केंद्र सरकारणे घेतलेल्या निर्णयाबद्दल अभिनंदन करतील.
या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, ओडिशाच्या उपमुख्यमंत्री पार्वती परिदा, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि उपमुख्यमंत्री अरुण साव आणि विजय शर्मा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा पोहोचले आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सर्वांचे स्वागत केले.
सुशासनाच्या सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण
या सत्रात विविध राज्यांच्या सरकारांनी राबवलेल्या सुशासनाच्या यशस्वी मॉडेल्सची माहिती सादर करण्यात येणार आहे. तसेच एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षपूर्तीबरोबरच आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दशकपूर्ती आणि आणीबाणीच्या ५०व्या वर्षानिमित्त 'लोकशाही हत्या दिवस' आयोजित करण्यावरही चर्चा होणार आहे.