विविधतेने नटलेले जैवविश्व

जैवविविधता दिवस आपल्याला निसर्गाच्या अपार संपत्तीची जाणीव करून देतो. हा दिवस आपल्याला निसर्गात असलेल्या असंख्य वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक, जलचर व अगणित सूक्ष्मजीवांची विविधता जपून ठेवण्याची व संवर्धन करण्याची आठवण करून देतो.

Story: साद निसर्गाची |
25th May, 02:50 am
विविधतेने नटलेले जैवविश्व

आपण दरवर्षी २२ मे रोजी जागतिक जैवविविधता दिन साजरा करतो. जैवविविधता म्हणजे पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या वृक्ष, प्राणी, पक्षी, कीटक, बुरशी व सूक्ष्मजीवांचं अद्भुत जाळं. जैवविविधता दिवस आपल्याला निसर्गाच्या अपार संपत्तीची जाणीव करून देतो. हा दिवस आपल्याला निसर्गात असलेल्या असंख्य वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक, जलचर व अगणित सूक्ष्मजीवांची विविधता जपून ठेवण्याची व संवर्धन करण्याची आठवण करून देतो.

जैवविविधता ही आपल्या अन्नसाखळीचा, औषधनिर्मितीचा आणि संपूर्ण परिसंस्थेचा आधार आहे. जैवविविधतेमुळे आपला पर्यावरणीय समतोल टिकून राहतो. जैवविविधता मानवी जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या विविध संसाधनांची उपलब्धता सुनिश्चित करते. मानवजातीचं अस्तित्व राखून ठेवायचं असेल तर वनस्पती, प्राणी, अन्न व इतर विविध घटक टिकवून ठेवणे बंधनकारक आहे. भाजीपाला, मासळी, फळे, कडधान्य यातील विविधता टिकली तरच आपल्याला पोषक आहार मिळू शकतो. विविध प्रकारची वनस्पती पृथ्वीचं तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतात तर प्राणीमित्र अन्नसाखळी संतुलित ठेवतात. 

जैवविविधता पर्यटन, मत्स्यपालन, वन उत्पादने यांसारख्या क्षेत्रांना चालना देत आर्थिक विकास साधण्यास मदत करते. मानवी हस्तक्षेप, वनांची कत्तल, वायू/जल/मृत्तिका प्रदूषण, हवामान बदल यामुळे जैवविविधता संकटात येत आहे. या कारणांमुळे आज अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत तर कित्येक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. 

जैवविविधता संवर्धनाचे दोन मुख्य प्रकार आहेत. इन-सीटू (In-situ) संवर्धन व एक्स-सीटू (Ex-situ) संवर्धन. इन-सीटूमध्ये वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात संरक्षण दिले जाते. यासाठी राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, राखीव वनक्षेत्रे यांसारखी संरक्षित क्षेत्रे तयार केली जातात. एक्स-सीटूमध्ये वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासाबाहेर संरक्षित केले जाते. यासाठी प्राणीसंग्रहालय, वनस्पती उद्यान, यासारखी केंद्रे वापरली जातात. जैवविविधता राखण्यासाठी एक सामान्य माणूस काय करू शकतो? झाडे लावून त्यांचे जतन करणे, नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर‌ करणे, प्लॅस्टिकचा वापर टाळणे, पर्यावरण संवर्धनासाठी स्थानिक मोहिमांमध्ये सहभागी होणे, मुलांमध्ये निसर्गप्रेम रुजवणे या गोष्टी केल्यास आपण जैवविविधतेचे जतन करु शकतो. 

गोवा हा भारतातील जैवविविधतेचा मेरूमणी असं आपण म्हणू शकतो. भगवान महावीर/म्हादई/खोतीगाव/बोंडला अभयारण्य, सलीम अली पक्षी अभयारण्य, नैसर्गिक जंगलसंपदा, दुर्मिळ वनस्पती, विविध प्रजातींचे प्राणी व पक्षी ही आपली खरी ओळख आहे. गोव्याची जैवविविधता टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. राज्यातील पारंपरिक शेती, कुळागरे, खाजन, मीठशेती ही आपल्या राज्याची खरी ओळख. आपल्या पूर्वजांनी निसर्गाशी समन्वय साधून जोडलेली ही सोनेरी नाळ टिकवणे आपल्या हाती आहे.

गोव्यातील मायनिंगचे डंप हरित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जैवविविधता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले. गोव्यात नव्याने एग्रो क्लिनिक व मिठागरे सुरू करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. प्रत्येकाने आपल्या कृतीतून या निसर्ग संपदेचे जतन करणे, वृक्षसंवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे हेच या दिवसाचे खरे सार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री सावंत यांनी केले. 

आपली जैवविविधता केवळ एकाच दिवशी साजरी करणे पुरेसे नाही तर तिचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी दररोज प्रयत्न करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त, आपण जैवविविधतेचे संरक्षण आणि शाश्वत वस्तूंचा वापर करण्यासाठी सुरवात करूया. अन्नाची नासाडी कमी करूया आणि बाहेरील पदार्थ वाहून नेण्यासाठी पुन्हा वापरता येण्याजोग्या पिशव्या वापरूया आणि आपल्या जैवविविधतेला शाश्वत विकासाकडे नेऊया.

‘निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकास’ या घोषवाक्याने आपण सर्वांनी पर्यावरणाशी असलेलं नातं अधिक दृढ करण्याची गरज आहे. त्यामुळे जंगलतोड, प्रदूषण, प्लास्टिकचा वापर आणि अतीविकास या गोष्टी टाळून आपण जैवविविधतेचं रक्षण करूया. निसर्गाशी सुसंवाद साधत येणाऱ्या पिढीसाठी सुरक्षित आणि संपन्न पर्यावरण तयार करूया.


स्त्रिग्धरा नाईक

(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)