मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश
गडचिरोलीः महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात कवंडे इथल्या घनदाट जंगलात गडचिरोली पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) याच्यासोबत झालेल्या चकमकीत ४ नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त हाती आले आहे. जंगलात आणखी नक्षलवादी लपून बसले असल्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षा दलाने शोध मोहीम तीव्र केली आहे. घटनास्थळावरून शस्त्रास्त्र आणि नक्षली साहित्य जप्त करण्यात आले.
मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये 'दलम' संघटनेच्या म्होरक्यासह तीन सदस्यांचा समावेश आहे. सन्नू मासा पुंगाटी (वय ३५), अशोक ऊर्फ सुरेश पोरीया वड्डे ( वय ३८), विज्यो होयामी (वय २५) आणि तुनी पांडू वरसे ( वय २१) अशी मृत नक्षलवाद्यांची नावे आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे १४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या कारवाईबाबत माहिती दिली.
महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवर भामरागड उपविभागात घातपात घडविण्याच्या उद्देशाने मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती मिळतातच दबा धरून बसल्याची माहिती पोलिसांना गुरुवारी (ता. २२) मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी दुपारी भर पावसात अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाच्या १२ तुकड्या व सीआरपीएफ ११३ बटालीयन डी कंपनीची एक तुकडी तातडीने गुरुवारी दुपारी इंद्रावती नदीच्या काठावरील जंगल परिसरात रवाना करण्यात आली होती.
याच दरम्यान शुक्रवारी सकाळी नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबाराला सुरूवात केली, त्याला सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिले. पोलिसांचा वाढता दबाव पाहून उर्वरित नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
सुमारे दोन तास सुरू होती चकमक
सुमारे दोन तास चाललेल्या चकमकीनंतर या जंगल परिसरात जवानांनी शोध घेतला असता घटनास्थळावर दोन पुरुष व दोन महिला अशा एकूण चार नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांना घटनास्थळी एक एसएलआर, दोन ३०३ रायफल व एक भरमार बंदूक, वॉकीटॉकी, आक्षेपार्ह प्रचारकी साहित्य व इतर दैनंदिन वापराचे साहित्य आढळले.