वैष्णवीच्या मृत्यूला पती, सासू सासऱ्यासह नणंद जबाबदार, वाचा सविस्तर घटना
मुळशीः पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यातील भुकूम येथील २३ वर्षीय विवाहिता वैष्णवी शशांक हगवणे मृत्यू प्रकरणामुळे गेले आठ दिवस महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दिवसागणिक या प्रकरणातील अनेक कंगोरे समोर येत आहेत. त्यामुळे आता पुढे या प्रकरणाला नक्की काय वळण लागणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नक्की हे प्रकरण काय आहे याचा आम्ही घेतलेला हा आढवा-
वैष्णवी ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून. राजेंद्र हगवणे यांचे दोन्ही मुलगे (शशांक आणि सुशील) राजकारण आणि बांधकाम व्यवसायात असून आर्थिकदृष्ट्या सुखी आणि संपन्न असणारं हे कुटुंब. वैष्णवी कस्पटे आणि शशांक हगवणे यांचा २८ एप्रिल २०२३ रोजी सूसगाव येथे प्रेमविवाह झाला. घरच्यांच्या विरुद्ध जाऊन वैष्णवीने हे लग्न केलं होतं. लग्नात तिच्या माहेरच्यांनी हुंडा म्हणून तब्बल ५१ तोळे सोनं, फॉर्च्यूनर गाडी, महागडी भांडी, लग्नानंतर चांदीची मूर्ती, पती शशांकसाठी दीड लाखांचा मोबाईल, महगडा गॉगल, घड्याळ असं बरंच काही सासरच्या मंडळींना दिलं होतं. याशिवाय त्यांचं लग्नही थाटामाटात करण्यात आलं होतं.
मात्र लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्यांनी वैष्णवी आणि तिच्या माहेरच्या मंडळींकडे चांदीच्या भांड्यांची आणि वैष्णवीच्या वडिलांकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली. पण त्यांनी पैसे न दिल्याने हगवणे कुटुंबाने वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. ऑगस्ट २०२३ मध्ये वैष्णवी गर्भवती असताना शशांकने चारित्र्यावर संशय घेत वैष्णवीला मारहाण करत तिला घरातून बाहेर काढले होते. सततच्या मारहाणीला आणि मानसिक छळाला कंटाळून २७ नोव्हेंबर २०२३ रोजी वैष्णवीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपचारानंतर वैष्णवी बरी झाली, पण तिचा छळ सुरुच राहिला. शशांकने वैष्णवीच्या वडिलांकडे २ कोटींची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने वैष्णवीला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या.
१६ मे रोजी वैष्णवीचा संशयास्पद मृत्यू झाला. सुरुवातीला याला आत्महत्या म्हणून सादर करण्यात आले, परंतु शवविच्छेदन अहवालात गळफास आणि मारहाणीच्या जखमा आणि गळ्यावर लालसर व्रण आढळले. यामुळे खुनाचा संशय बळावला. वैष्णवीच्या आई-वडिलांनी तिचा हुंड्यासाठी छळ होत असून तिची हत्या केल्याचा आरोप केल्याने तिचा पती शशांक, सासू लता, सासरे राजेंद्र, नणंद करिश्मा आणि दीर सुशील यांच्यावर बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिसांनी तातडीने सासू लता, पती शशांक आणि नणंद करिश्मा यांना अटक केली मात्र सासरे राजेंद्र आणि दीर सुशील घटनेच्या दुसऱ्या दिवशीपासूनच (दि. १७) फरार होते. मात्र पुणे-बावधन पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 'मुहूर्त लॉन्स' येथे काल २३ मे रोजी पहाटे छापा टाकून राजेंद्र आणि सुशील यांना अटक केली. या दोघांनी फरार होण्यासाठी अनेक गाड्या आणि ठिकाणे बदलली, परंतु पोलिसांनी त्यांचा माग काढत अखेरीस त्यांना पकडले.
मोठ्या सुनेचाही छळ; याआधीच हगवणे कुटुंबाला होणार होती शिक्षा, पण...
वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी आता अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सूनेचा मयुरीचाही घरात छळ केला जात होता अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. वैष्णवी हगवणे यांच्या वहिनीने मयुरीने याबाबत पोलिसांसमोर खुलासा केलाय. पोलिसात याबाबत गुन्हाही दाखल केला होता. पण राजकीय दबावातून कारवाई झाली नाही. जर कारवाई झाली असती तर वैष्णवी जिवंत असती अशी प्रतिक्रिया मयुरी हगवणे यांनी दिलीय. मला मारहाण झाली तेव्हा मी याबाबत महिला आयोगाकडे ही तक्रार केली होती. तेव्हा महिला आयोगाने तक्रार नोंदवून घेतली पण त्यानंतर त्याचं काहीच झालं नाही. घरामध्ये माझा नवरा आणि दीर यांच्याकडे लायसन्स असलेली पिस्तूलं आहेत. सासऱ्याची दहशत असल्याने पोलीस कारवाई करत नाहीत. माझ्यावेळी पोलिसांनी कारवाई केली असती तर आता वैष्णवीचं प्रकरण झालं नसतं, असं मयुरी हगवणे यांनी सांगितलं आहे.
वैष्णवीचे व्हायरल कॉल रेकॉर्डिंग-
याप्रकरणाला नेमकं वळण मिळालं ते वैष्णवीच्या व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगमुळे. एका मैत्रिणीसोबत तिने फोनवरून आपल्या भावना शेअर केल्या होत्या. त्यात वैष्णवीने, सगळ्यांचा विरोध असताना लग्न केलं, ही चूक झाल्याचं म्हटलं आहे. वैष्णवीने आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा जणू पाढाच त्या फोन कॉलमध्ये वाचला होता.
नणंद करिश्मा हीच मुख्य सूत्रधार?
या प्रकरणात सर्वाधिक चर्चा करिश्मा हगवणे म्हणजे वैष्णवीच्या नणंदेची होत आहे. पोलिसांनी कारवाई करत वैष्णवीचे सासरे राजेंद्र, दीर सुशील, सासू लता, पती शशांक आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक केली आहे. मात्र यामध्ये वैष्णवीचा सर्वाधिक छळ नणंद करिश्मा हगवणे हिनेच केल्याची माहिती समोर येत आहे. केवळ वैष्णवीच नाही, तर हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरीचाही अशाच प्रकारे मारहाण करून छळ करण्यात आला.
मयुरीच्या म्हणण्यानुसार, करिश्मा ३४ वर्षांची असून तिची 'पिंकीताई' म्हणून ओळख आहे. ती एक फॅशन डिझायनर असून, 'लक्ष्मीतारा' या नावाने तिने एक कंपनी सुरू केली आहे. तिचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याची चर्चा वैष्णवी मृत्यू प्रकरणानंतर सुरू आहे. करिश्मा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असताना बऱ्याच आंदोलनांमध्ये दिसली होती. करिश्माचा आपल्या आई-वडिलांवर पूर्ण ताबा होता. घरातली मोठी असल्याने ती लाडाची होती. त्यामुळे साहजिकच घरातील सर्व निर्णय तिच्या हाती होते. धक्कादायक म्हणजे वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी करिश्माने तिला धमकावले, गरोदर असताना उन्हात उभे केले, तिला त्रास दिला असा आरोप आहे. नंतर माहेरी मारत आणून सोडले. माहेरी आणतानाही गाडीत वैष्णवीला मारहाण केली होती.
वैष्णवीचं बाळ कुणाच्या ताब्यात?
वैष्णवीच्या मृत्यूनंतर बाळाला दुसऱ्याच्या स्वाधीन करून तिचा सासरा आणि दीर दोघे फरार झाल्यामुळे बाळाचा ठावठिकाणा लागत नव्हता. मुलगी गेल्याचे दुःख पचवत तिच्या कुटुंबीयांनी बाळाचा नातेवाइकांकडे शोध सुरू ठेवला होता. वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे आणि त्यांचे कुटुंबीय सोमवारी (ता. १९) वैष्णवीच्या बाळाला आणण्यासाठी हगवणे यांच्या घरी गेले होते. तेव्हा त्यांना ते बाळ वैष्णवीचा पती शशांक याचा मित्र नीलेश चव्हाण नामक व्यक्तीकडे असल्याचे समजले.
'बाळाला घेऊन जाण्यासाठी आम्ही कर्वेनगर येथे गेल्यावर नीलेश चव्हाण याने बाळाला ताब्यात देण्यास नकार दिला. तरीही आम्ही बाळाला आमच्याकडे ओढून घेत असताना चव्हाण याने त्याच्या कमरेला खोचलेले पिस्तुल काढून आमच्यावर रोखले आणि त्यानंतर आम्हाला धक्के मारून घराबाहेर काढले. मात्र तीन दिवसांनी चव्हाण याने आम्हाला फोन बाणेरमध्ये महामार्गाजवळ येऊन बाळाला घेऊन जा, असे सांगितले. तेथे एक व्यक्ती बाळाला आमच्या ताब्यात देऊन गाडीत बसून निघून गेली,' अशी माहिती वैष्णवीचे चुलते मोहन कस्पटे यांनी दिली आहे.
नीलेश चव्हाणच्या घरावर छापेमारी, पोलीस स्टेशनला हजर राहण्याची नोटीस
वैष्णवीचे बाळ लपवून ठेवणारा नीलेश चव्हाण हा २१ मे पासून फरार आहे. नीलेशवर या आधी पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात वैष्णवी हगवणेच्या माहेरच्यांना धमकावल्याचा गुन्हा दाखल आहे. हगवणेंच्या गुन्ह्यांमध्ये साथ देणाऱ्या नीलेशची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरूपाची आहे. हगवणे कुटुंबीय जसा आपल्या सुनांचा छळ करायचे, तसेच नीलेश चव्हाणही आपल्या बायकोचा अतोनात छळ करायचा अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच नीलेश हा विकृत प्रवृत्तीचा असून त्याच्या बायकोला नीलेशच्या लॅपपमध्ये मुलींचे आक्षेपार्ह व्हिडीओ मिळाले असल्याचीही माहिती प्रसारित होत आहे. दरम्यान नीलेशच्या घरावर पोलिसांनी शुक्रवारी (23 मे) मध्यरात्री छापेमारी केली. त्याच्या लॅपटॉपसह इतर काही गोष्टी पोलिसांनी जप्त केल्या असून पुणे पोलिसांकडून त्याला पोलीस स्टेशनला हजर राहण्याची नोटीस देखील पाठवण्यात आली आहे.
राजकीय पडसाद-
• राजेंद्र हगवणे पक्षातून बडतर्फ
वैष्णवीच्या मृत्यूनंतर अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांशी बोलून तत्काळ दोषींवर कारवाई करण्यात यावी असे आदेश दिले आहेत. तसेच राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. तर जी घटना घडली ती मानवतेला काळिमा फासणारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या प्रवृत्तीचा निषेध करते. वैष्णवी हगवणे या बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे ही आमची मागणी असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष, सूरज चव्हाण यांनी सांगितले आहे.
• खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा- कस्पटे कुटुंबीय
'आमच्या मुलीचा जीव घेणाऱ्यांना मकोको कायद्यांतर्गत त्यांना कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यात कोणत्याही मुलीवर अशी वेळ येऊ नये. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून वैष्णवीला त्वरित न्याय मिळवून द्यावा,' अशी मागणी कस्पटे कुटुंबीयांनी केली आहे.
• लवकरात लवकर गुन्ह्याचा छडा लावा- रूपाली ठोंबरे
‘वैष्णवी हगवणे हिची आत्महत्या की हत्या याबाबत संशय आहे. पोलिसांनी योग्य तपासातून लवकरात लवकर गुन्ह्याचा छडा लावावा. गुन्हेगारांना पाठीशी घालू नये. महिलांना सुरक्षित आणि निर्भयतेने जगता यायला हवे, असे रूपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.
• न्यायाच्या प्रक्रियेत तडजोड नाही
मी आणि राज्य सरकार कस्पटे कुटुंबाच्या पाठिशी आहे. ज्या व्यक्तींनी तिच्यावर अन्याय केला, त्यांना कडक शिक्षा व्हावी, न्यायाच्या प्रक्रियेत तडजोड केली जाणार नाही. - अदिती तटकरे, महिला व बालविकासमंत्री
• दोषींना कठोर शिक्षा होणारच
एखादी व्यक्ती राजकीय पक्षात असली म्हणजे त्या व्यक्तीला काहीही करायचा परवाना मिळत नाही. या प्रकरणात ज्यांचा हात आहे, त्यांना कठोर शिक्षा होईल. - उदय सामंत, उद्योगमंत्री
सद्यस्थितीत वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संताप निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरही निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटत असून वैष्णवीला न्याय मिळावा, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी निरनिराळे हॅशटॅग ट्रेंडींग होत आहेत. मात्र या केसमध्ये पारदर्शक तपास होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.