नवी दिल्ली : दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट 6E-2142 ला बुधवारी हवामानाच्या तीव्र संकटाचा सामना करावा लागला. गारपीटीसह वादळी वाऱ्यांमध्ये सापडलेले हे विमान काही वेळ पाकिस्तानच्या हवाई हद्दीत नेणे गरजेचे होते. मात्र पाकिस्तानने एअरस्पेस वापरण्यास नकार दिला. परिणामी, भारतीय वायुदलाने पुढाकार घेत विमानाची सुरक्षित लँडिंग सुनिश्चित केली.
पाकिस्तानने नाकारला एअरस्पेसचा वापर
वादळी हवामानामुळे फ्लाइटच्या पायलटने लाहोर एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे मार्ग बदलण्याची विनंती केली होती. पण ११ मेपासून लागू असलेल्या बंदीमुळे पाकिस्तानी एटीसीने त्वरित नकार दिला. हा निर्णय 'ऑपरेशन सिंदूर' आणि सीमावर्ती वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतीय वायुदलाची त्वरित मदत
या संकटानंतर इंडिगोच्या पायलटने भारतीय वायुदलाच्या उत्तरी कमांडशी संपर्क साधला. वायुदलाने दिल्लीतील हवाई नियंत्रण केंद्राशी समन्वय साधत, विमानासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला. परिणामी विमान श्रीनगरच्या दिशेने वळवले गेले. पायलटने मोठ्या धाडसाने विमानाची दिशा बदलली आणि वादळातून बाहेर पडत सुरक्षितपणे श्रीनगर विमानतळावर लँडिंग केली. यावेळी फ्लाइटमध्ये २०० हून अधिक प्रवासी होते. पायलट आणि क्रूच्या कौशल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
विमानासमोरील नुकसान आणि तपासणी सुरू
उतरल्यानंतर विमानाच्या पुढील भागात नुकसान झाल्याचे समोर आले. सुदैवाने कोणतीही जखमीची नोंद नाही. डीजीसीए (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) या घटनेची अधिकृत चौकशी करत असून, फ्लाइट डेटा आणि कॉकपिट वॉईस रेकॉर्डिंगचे विश्लेषण सुरू आहे. या घटनेत भारतीय वायुदलाच्या तत्काळ प्रतिसादामुळे आणि पायलटच्या प्रसंगावधानामुळे एक मोठी दुर्घटना टळली. मात्र पाकिस्तानच्या एअरस्पेस नाकारण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.