ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता...

हे गाणे ऐकत जातो, तेव्हा कवी ग्रेस आणि हृदयनाथ मंगेशकर हे दोन द्वयी म्हणजे काव्य आणि संगीत क्षेत्रातील काय चीज आहेत, याची मनोमन खात्री पटते.

Story: शब्दगीते |
23rd May, 09:23 pm
ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता...

‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता...’ हे गाणे ऐकताना, कवी ग्रेस आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर या दोन महान कलाकारांनी काव्य आणि संगीत क्षेत्रात किती अजोड किमया साधली आहे, याची मनोमन खात्री पटते.

कवी ग्रेस यांची ही कविता पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या धीरगंभीर आवाजात ऐकताना आपण एका गूढ वातावरणाच्या गर्तेत ओढले जातो. कवी ग्रेस या नावातच 'ग्रेस' असल्याने त्यांच्या कविताही 'ग्रेसफूल' आहेत असे संबोधले तर ते काही वावगे ठरणार नाही. ग्रेस हे व्यक्तिमत्त्व जितके गूढ होते, तितकीच गूढता त्यांच्या कवितेतही आढळते. या गूढ व्यक्तिमत्त्व लाभलेल्या कवीच्या लेखणीतून जेव्हा गूढ कविता जन्माला आल्या आणि त्यांना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या धीरगंभीर आवाजाने स्वरसाज चढला गेला, तेव्हा ती प्रत्येक कलाकृती रसिकांच्या हृदयात खास जागा करून राहिली. ही द्वयी म्हणजे काव्य आणि संगीत क्षेत्रातील एक अपूर्व संगम आहे, ज्यातून जन्माला आलेल्या कलाकृती मनाला अंतर्मुख करतात.

कवी ग्रेस म्हणजेच माणिक गोडघाटे यांच्या 'चंद्रमाधवीच्या प्रदेशात' या कविता संग्रहातील 'ती गेली तेव्हा...' ही कविता जेव्हा पं. हृदयनाथ यांच्या संगीताने गाण्यात नटली, तेव्हा त्यातील गर्भितार्थ अधिक गहिरा झाला आणि जितक्या वेळा आपण हे गाणे ऐकत जातो, तेव्हा कवी ग्रेस आणि हृदयनाथ मंगेशकर हे दोन द्वयी म्हणजे काव्य आणि संगीत क्षेत्रातील काय चीज आहेत, याची मनोमन खात्री पटते.

‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता

मेघांत अडकली किरणे... हा सूर्य सोडवीत होता!’

गाण्याच्या सुरुवातीच्या ओळीतच जाणवते की कवी किती गूढावस्थेत गुरफटून गेला आहे! पावसाची सर जेव्हा धडकते, तेव्हा त्याचा निनादणारा आवाज हा मनात थैमान घालत होता. या कवितेतील 'ती' म्हणजेच आई, आणि या आईच्या जाण्याने, तिच्या विरहाच्या वेदना अशा काही मनात गुरफटल्या गेल्या की त्यातून बाहेर येणे हे मुश्किलीचे ठरले. कवी ग्रेस यांनी या अडकलेल्या वेदनांना मेघांत अडकलेल्या किरणांच्या माध्यमातून आपल्या कवितेत सादर केले. पाऊस गरजत बरसत होता, हे पावसाचे गरजणे आणि त्यातून निर्माण होणारा नाद जसा निनादत राहतो, अगदी त्याचप्रमाणे आई गेल्यावर आईच्या आठवणी मनात बरसत, निनादत होत्या. मनात गुंतलेल्या या आठवणीतून सोडवताना मनाची जी स्थिती झाली, ती काव्यात्मक स्वरूपात मांडताना कवी ग्रेस म्हणतात, 'मेघांत अडकली किरणे... हा सूर्य सोडवत होता.'

ती आई होती म्हणूनी... घनव्याकुळ मी ही रडलो...

त्यावेळी वारा सावध... पाचोळा उडवीत होता...’

या ओळीतील 'घनव्याकुळ' हा शब्दच मनाला किती व्याकुळ करून जातो! 'घनव्याकुळ मी ही रडलो...' ही ओळ गाताना पंडित हृदयनाथ यांनी असा काही आलाप घेतला आहे की, हा आलाप मनाच्या गाभार्‍यात जपलेल्या आईच्या आठवणींना आपसूकच हात घालतो आणि आईच्या आठवणी भराभर उसवल्या जातात. आठवणी उसवल्यावर कोलमडून गेलेले मन घनव्याकूळ होऊन आक्रंदत राहते. या ओळीतील 'घनव्याकुळ' हा शब्द पं. हृदयनाथ यांनी दोनदा 'घनव्याकुळ... घनव्याकुळ' इतक्या गहिर्‍या आवाजात आळवला आहे की आई आता कधीच परतून येणार नाही, याचे शल्य किती विदारक आहे, याचा प्रत्यय येताना आपणही अगदी घनव्याकूळ होऊन जातो. 'त्यावेळी वारा सावध... पाचोळा उडवीत होता.' या गाण्याच्या पुढील ओळीतून कवी आपल्या मनातील भावना व्यक्त करतात. आईच्या आठवणींनी गलबलून जाताना मनातून कोलमडलो तरी प्रसंगावधान राखणे गरजेचे आहे हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे उडणाऱ्या पाचोळ्याप्रमाणे आठवणी सैरभैर जरी झाल्या, तरीही मनाला सावरणे गरजेचे आहे, याची त्यांना जाणीव आहे. हा पाचोळा म्हणजे केवळ आठवणी नाहीत, तर आईच्या अनुपस्थितीत जीवनात येणारी अस्थिरता, ज्याला वाऱ्याच्या मदतीने सावरण्याचा प्रयत्न केला जात आहे.

‘अंगणात गमले मजला

संपले बालपण माझे

खिडकीत धुरकट तेव्हा

कंदील एकटा होता!’

गाण्याच्या या शेवटच्या कडव्यात कवीने आईच्या जाण्याने भळभळते दुख, वेदना या स्वीकारल्या असून तो यांना सामोरा गेला आहे. आई जिवंत आहे, तोपर्यंत आपण आईचे लहान बाळ असतो, पण आईच्या जाण्याने हे बालपण संपून गेल्याची खंत मनात आहे. आपल्या जीवनाला मार्गदर्शक असणारी, निराशेच्या गर्तेत असताना आशेचा प्रकाश दाखवणारी आई जेव्हा कायमचा निरोप घेते, तेव्हा तिच्यामागे एकटेपणाची जाणीव होताना ती दर्शवताना कवी म्हणतात, 'खिडकीत धुरकट तेव्हा... कंदील एकटा होता!' ही एकटेपणाची जाणीव किती भयानक असते कारण आपल्या मायेच्या व्यक्तीची ताटातूट ही जीवाला घोर लावते. 


- कविता आमोणकर, मडगाव