रजोनिवृत्ती आणि नैराश्य

मासिक पाळी आलेल्या प्रत्येक महिलेला कधी ना कधी रजोनिवृत्तीतून जावे लागते. जरी प्रत्येक महिलेला रजोनिवृत्तीची तीव्र लक्षणे आणि दुष्परिणाम होत नसले तरी, आपण सर्वोत्कृष्ट आरोग्याची खात्री करण्यासाठी जागरूक असणे आणि नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे.

Story: आरोग्य |
23rd May, 09:16 pm
रजोनिवृत्ती आणि नैराश्य

महिलांमध्ये रजोनिवृत्ती, यौवन, प्रसूतीदरम्यान आणि अगदी मासिक पाळीदरम्यान हार्मोनल बदल होत असतात. यातील रजोनिवृत्तीचा सुरुवातीचा काळ बऱ्याचदा खूप त्रासदायक असू शकतो. यादरम्यान सामान्यपेक्षा स्त्रावाची पातळी कमी होणे, पाळी मंदावणे व बंद होणे या लक्षणांसह मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. रजोनिवृत्ती दरम्यानचा मानसिक प्रवास खूप कठीण असू शकतो, ज्यामुळे मूड स्विंग होऊ शकतात व नैराश्याचा धोका उद्भवू शकतो. साधारणपणे, महिलांना रजोनिवृत्तीदरम्यान मानसिक आरोग्याचे आजार होण्याची शक्यता पुरुषांपेक्षा दुप्पट असते. खरं तर, रजोनिवृत्तीच्या वेळी जवळजवळ ५०% महिला थोड्या प्रमाणात नैराश्याचा सामना करतात.

जेव्हा शेवटच्या मासिक पाळीच्या १२ महिन्यांपर्यंत पाळी येत नाही, तेव्हापासून रजोनिवृत्तीचा काळ मानला जातो. त्याआधी, प्रजनन संप्रेरकांमध्ये बदल होत असताना महिला पेरी-मेनोपॉजच्या टप्प्यात असतात व अशा वेळी नैराश्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

हार्मोनल चढउतार

 मानसिक स्थितीत होणारे बदल हे आपल्या मेंदूत स्रवल्या जाणाऱ्या काही हार्मोन्सवर झालेल्या परिणामामुळे होऊ शकतात, ज्यामुळे आपल्या मूडमध्ये बदल दिसतो. आपल्या शरीरातील अंतःस्रावी पातळीत बदल झाल्याने पेरीमेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीच्या काळादरम्यान उदासीनता, तीव्र पॅनीक हल्ले, चिंता, उदासीनता दिसून येते. आपल्या मासिक पाळीवर नियंत्रण ठेवणारे हार्मोन्स सेरोटोनिनवर देखील परिणाम करतात, जे मेंदूतील उल्हास आणि आनंदाची भावना वाढवतात. जेव्हा हार्मोनची पातळी कमी होते, तेव्हा सेरोटोनिनची पातळी देखील कमी होते, ज्यामुळे चिडचिड, चिंता आणि दुःख वाढते. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी झाल्यामुळे मूडमध्ये बदल होऊ शकतात, ज्यामुळे आपण सामान्यपणे ज्या गोष्टींना तोंड देऊ इच्छितो, त्या गोष्टींना तोंड देण्यास कमी सक्षम होतो. या हार्मोनल बदल झाल्यामुळे नैराश्याचा प्रसंग येऊ शकतो.

रजोनिवृत्तीची लक्षणे

 मानसिक स्थितीत बदल, चिंता आणि सामान्य अस्वस्थता यासोबत सतत चिडचिड होणे, मुलांची-पालकांची-जोडीदाराची अनावश्यक काळजी करत राहणे, आपल्या तब्येतीची चिंता करणे, अचानक भीती किंवा फोबिया वाटणे, परिस्थितीचा सामना करण्यात अडचण येणे, असहायतेची भावना वाटत राहणे, प्रत्येक गोष्टीत "मी हे करू शकत नाही!" असा विचार करत राहणे, सामाजिक चिंता वाटणे, आत्मविश्वास कमी होणे यांसारखी लक्षणे दिसतात.

डॉक्टरांना कधी भेटावे?

 जेव्हा सतत नकारात्मकता, नैराश्य आणि चिंता या भावनांमुळे कामात आणि आपल्या नातेसंबंधात अडचणी येत असतील, अशा वेळी वैद्यकीय मदत घेण्याची गरज असते. यासोबत आपण स्वतःची विध्वंसक असल्यास, आत्मघाती विचार मनात येत असल्यास किंवा याबद्दल बोलण्यास आपल्याजवळ कोणी नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ज्यांना हार्मोनल औषधे देऊ शकत नाही, त्यांना नैराश्याच्या लक्षणांसाठी अँटीडिप्रेसंट्स उपयुक्त ठरू शकतात. तसेच, संज्ञानात्मक वर्तणुकीय थेरपीसह अँटीडिप्रेसंट्स उपचार हा नैराश्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग आहे.

ध्यान आणि व्यायाम

 ध्यान, श्वासोच्छ्वासाचे व्यायाम आणि निसर्गात वेळ घालवणे यांसारख्या स्वतःची काळजी घेण्याच्या पद्धती फायदेशीर ठरू शकतात. पौष्टिक आहार आणि पुरेशी शारीरिक हालचालसुद्धा भावनिक स्थिरता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

चांगली झोप

 चांगली झोप मिळत नसल्यास नैराश्याचा त्रास वाढू शकतो, म्हणून रात्रीची झोप नीट होत असल्याची खात्री करून घ्यावी. अपुऱ्या झोपेमुळे मूड स्विंग्स होऊन जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. अशा वेळेस सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. औषधे, समुपदेशन किंवा टॉक थेरपी आधार आणि आराम देऊ शकतात.

निरोगी जीवनशैली

 जीवनशैलीतील बदलांमुळे रजोनिवृत्तीच्या आधीच्या लक्षणांची तीव्रता कमी होण्यास आणि रजोनिवृत्तीनंतरचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊ शकते. निरोगी सवयींमध्ये पौष्टिक आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि कॅफिन व अल्कोहोलचे सेवन मर्यादित करणे समाविष्ट आहे.

निष्कर्ष

 मासिक पाळी आलेल्या प्रत्येक महिलेला कधी ना कधी रजोनिवृत्तीतून जावे लागते. जरी प्रत्येक महिलेला रजोनिवृत्तीची तीव्र लक्षणे आणि दुष्परिणाम होत नसले तरी, आपण सर्वोत्कृष्ट आरोग्याची खात्री करण्यासाठी जागरूक असणे आणि नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी व्यायाम आणि निरोगी खाणे सुरू करा. आपल्याला समजणाऱ्या लोकांसोबत स्वतःला जोडून घ्या. ते खरोखर तुमचा प्रवास सुखकर बनवू शकतात. काळजी करू नका! जीवनात समोऱ्या गेलेल्या इतर सर्व आव्हानांप्रमाणेच तुम्ही या आव्हानातूनही पुढे जाल.


- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर