प्रत्येकजणच जणू एका पूर्वग्रहदूषित चष्म्यातून दुसऱ्याकडे बघतोय. आपण श्रेष्ठ आणि समोरचा आपल्यापेक्षा कमी ही भावना सगळ्यांमध्ये इतकी जोर धरते आहे की आपण सर्वात महत्त्वाचीच गोष्ट विसरत जात आहोत...
निरीक्षण ही अजब गोष्ट आहे खरी. आपण आपल्याही नकळत काही गोष्टींचं निरीक्षण करत असतो. त्या आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या नसताना, कित्येक वेळा केवळ वेळ जावा या हेतूने हे निरीक्षण चालू असते. पण या गोष्टी मात्र आपल्या मनात, डोक्यात कुठेतरी नोंदवल्या जात असतात. कधीतरी मग आपण कुठेतरी काहीतरी बघतो, वाचतो, ऐकतो आणि या नकळतपणे नोंदवलेल्या गोष्टी मग आपल्याला अचानकच आठवतात. त्यातून मग आणखी काहीतरी आठवते आणि आठवणींच्या या फांद्या एकमेकांमध्ये अडकून मोठा पसारा होतो. या पसाऱ्यातून कधीतरी काहीतरी हातीही लागतं. कधी आपल्यालाच एखाद्या गोष्टीची जाणीव होते, कधी समविचारी लोकांशी याबद्दल चर्चा होते किंवा कधीतरी फक्त विचारांना दिशा आणि चालना मिळते.
आपण बऱ्याचदा आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचे श्रेय दुसऱ्यांना देत असतो. म्हणजे आपल्याकडून ती गोष्ट करवून घेणाऱ्या माणसांना म्हणा किंवा ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देणाऱ्या माणसांना आपण आपल्या यशाचे श्रेय देतो. कधीकधी यशस्वी होण्यासाठी लागणारे कौशल्य आपल्यात नसते. या गोष्टी आपल्याला कुणीतरी शिकवते आणि आपण आपल्या यशाचे श्रेय त्यांना देतो. कित्येकदा सगळे असते आपल्याकडे पण आपला विचार योग्य मार्गावर नसतो. अशावेळी मग कुणीतरी येते आणि आपल्या विचारांची गाडी सरळ रस्त्याला लावते. आपले कष्ट, ज्ञान जितके महत्त्वाचे तितकाच किंवा त्यापेक्षा जरा जास्तच हा छोटासा धक्का महत्त्वाचा ठरतो. कारण सगळे असूनसुद्धा जर आपण चुकीच्या दिशेने जात असू तर काय उपयोग?
आपल्या व्यवसायात, नोकरीत यशस्वी असणाऱ्या बहुतेक माणसांशी बोलताना लक्षात येते, की त्यांच्या यशाचे श्रेय ते त्यांच्या कारकिर्दीत कधीतरी येऊन गेलेल्या त्यांच्या एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देतात. बॉस... हा शब्द बऱ्याचदा विनोदनिर्मितीसाठी वापरला जातो पण असा एखादा बॉस खरेच असतो जो आपल्याला केवळ व्यावसायिक नाही तर व्यक्तिगत आयुष्यातही बरेच काही शिकवून जातो.
अलीकडेच फिरायला गेले असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. लोक एकमेकांशी फार तुच्छतेने वागायला, बोलायला लागले आहेत. व्यापारी गिऱ्हाईकांशी, स्थानिक लोक पर्यटकांशी, पर्यटक स्थानिक व्यापारांशी.. प्रत्येकजणच जणू एका पूर्वग्रहदूषित चष्म्यातून दुसऱ्याकडे बघतोय. आपण श्रेष्ठ आणि समोरचा आपल्यापेक्षा कमी ही भावना सगळ्यांमध्ये इतकी जोर धरते आहे की आपण सर्वात महत्त्वाचीच गोष्ट विसरत जात आहोत... की आपण सगळीच माणसे आहोत, समान आहोत. आपल्या कामांनी, व्यवसायांनी, आवडीनिवडीने, परिस्थितीने विभागली गेलेली माणसे! आपल्याकडूनही कदाचित हेच होत असावे पण तिऱ्हाईताच्या नजरेतून बघताना लक्षात आले की काहीच अडचण नाहीये खरेतर. लोकांनी फक्त हा चष्मा उतरवून संवाद साधायला हवा आहे.
तुम्ही म्हणाल, आज या कोणत्या दोन एकमेकांशी संबंध नसलेल्या गोष्टी आल्या? लिहिताना काही चूक तर झाली नाही ना? पण नाही. या दोन गोष्टींचा जरी अर्थाअर्थी संबंध नसला, तरी त्या अशाप्रकारे मला आठवल्या त्याला एक छोटेसे कारण आहे.
‘युट्यूब’वर फिरता फिरता सहज एका तामिळ लघुपटापाशी थांबले, ‘नेरकानल’. इंग्रजी सबटायटल असल्यामुळे बघायला हरकत नव्हती. एक होतकरू, नुकतेच लग्न झालेला मुलगा ऑन-साईट जाण्यासाठी आतुर असतो. तशी संधीही त्याच्याकडे आलेली असते, पण त्याआधी त्याला त्यांच्या कंपनीच्या व्हाइस प्रेसिडेंट मॅडमने भेटायला बोलावले असते. सुरुवातीला त्याच्या बोलण्याने त्या सुखावलेल्या असतात. पण नंतर त्याची वर्तणूक खटकणारी असते. लग्न जमण्यात आड येणाऱ्या जातीभेदाबद्दल तावातावाने बोलत असताना तो त्याच्याही नकळत कॅफेमधल्या वेटरला कमी लेखणारे उद्गार काढतो. मॅडमचा निर्णय बदलतो. तो बरोबरच असतो कारण, त्याच्यावर ऑन-साईटची मोठी जबाबदारी टाकायची असते. त्यासाठीच सर्व दृष्टिकोनातून त्याची पडताळणी सुरू असते, कदाचित. त्यामुळे त्याचे असे विचार हे त्याच्याखाली काम करणाऱ्या आणि पर्यायाने कंपनीसाठी घातक असू शकतात. पण मॅडम तिथेच थांबत नाहीत. त्या अतिशय कठोरपणे त्याला समज देतात. त्याची चूक त्याला कळलेली असते कारण त्याच्या हातून ऑन-साईट जायची संधी एव्हाना गेलेली असते. पण त्यातही मॅडम त्याचे वैयक्तिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतात. चांगले नेतृत्व करण्यासाठी ही गोष्ट किती गरजेची आहे, ना? त्यालाही चूक उमगते आणि तो, केवळ त्यांना दाखवण्यापुरतीच नाही, तर मनापासून ती सुधारण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या हातून गेलेली संधी त्याला लगेच परत मिळेल का नाही ही गोष्ट एकीकडे पण यातून त्याला मिळालेला धडा हा त्या संधीपेक्षा मोठा असेल आणि त्याला मिळणाऱ्या यशात या संधीपेक्षा या शिकवणीचा वाटा अधिक असेल.
लेखात सुरुवातीला उल्लेख केलेल्या दोन गोष्टी याच निमित्ताने आठवल्या. वाटले, किती सोपे होते चष्मा उतवरून माणूस म्हणून समोरच्याला बघणे! आपल्यालाही जमायला हवे. आपल्या नकळतही आपल्याकडून असे घडत असेल तर यानिमित्ताने त्याकडे लक्ष दिले जाईल. लघुपटातला नायक त्याच्या यशाच्या गोष्टी सांगताना त्याच्या मॅडमचा नक्की उल्लेख करेल, पण आपल्याला पुश देण्याचे काम कधी व्यक्ती करतात, कधी पुस्तके तर कधीकधी लघुपट याचीही त्याबरोबर जाणीव झाली.
मुग्धा मणेरीकर
फोंडा