संसद सदस्य शशी थरूर यांनी वास्तव सांगितले असेल तर ते मान्य करण्याची व्यापक दृष्टी काँग्रेसजवळ नाही, हेच या घटनेवरून दिसून येते. थरूर यांच्यानंतर दुसरा धक्का कोणी दिला असेल तर तो माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी.
काँग्रेस पक्षाच्या भवितव्याबाबत काही ज्येष्ठ नेतेच साशंक असल्याचे अलीकडे दिसून येऊ लागले आहे. खरे तर हा जुना पक्ष वाढावा, त्याला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे, अशी तळमळ असलेले काही नेते काँग्रेस पक्षात आहेत, मात्र त्यांची उपेक्षा केली जात आहे. संसद सदस्य शशी थरूर किंवा पी. चिदंबरम हे नेते नेहमीच अभ्यासू मानले जातात. ते व्यासंगी समजले जातात. त्यांच्या मतांची राष्ट्रीय स्तरावरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली जाते. यामागचे कारणही तसेच आहे. ते बोलताना मुद्देसूद आणि संक्षिप्तपणे अर्थपूर्ण बोलतात. अशा नेत्यांना काँग्रेसची सूत्रे सांभाळणाऱ्या गांधी कुटुंबाने सुरक्षित अंतरावर ठेवले आहे. त्यांचा हस्तक्षेप, त्यांचे विचार, त्यांची कार्यपद्धत आणि त्यांचा एकंदरित दर्जा पक्षाला परवडणारा नाही, असाच सूर विद्यमान काँग्रेस नेत्यांमध्ये दिसतो आहे. मोदी सरकारच्या पाकिस्तानविरोधातील ऑपरेशन सिंदूर मोहिमेचे शशी थरूर यांनी कौतुक केले. ही कारवाईच नव्हे तर मोदी यांचे खंबीर नेतृत्व आणि धोरण देशाला लाभदायक ठरल्याचे त्यांनी केलेले वक्तव्य काँग्रेसला मानवलेले नाही. प्रत्यक्षात सर्वपक्षीय बैठकीत ऐक्याचे दर्शन घडविले गेले, त्यावेळी काँग्रेस पक्षानेही सरकारला पाकिस्तानविरोधात कोणत्याही कारवाईस समर्थन देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसारच, शशी थरूर यांनी जर जाहीर वक्तव्य केले, तर त्यास आक्षेप घेण्याचे पक्षाला कारण नव्हते. थरूर यांनी व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, पक्षाशी त्याचा संबंध नाही, असे स्पष्टीकरण देणारा पक्ष त्यांना याबाबत जाब विचारण्याचे धाडस करू शकलेला नाही, हेही लक्षात घ्यावे लागेल. काँग्रेसची सध्याची कार्यपद्धत अनेकांना मानवत नाही, तरीही ते ध्येयधोरणांसाठी पक्षात राहिले आहेत. त्यांना दुसरे टोक गाठणे कठीण होत असते. असे असले तरी थरूर पक्षत्याग करतील, भाजपमध्ये जातील अशा चर्चांना उधाण आले आहे. पक्षहिताच्या चार गोष्टी बोलणेही जेथे सहन केले जात नाही, तेथे कशाला राहायचे असा विचार विचारवंत नेते करीत असतात. त्यांचा पुढील पवित्रा लक्षात येणे कठीण बनते. थरूर यांनी वास्तव सांगितले असेल तर ते मान्य करण्याची व्यापक दृष्टी काँग्रेस पक्षाजवळ नाही, हेच या घटनेवरून दिसून येते. थरूर यांच्यानंतर दुसरा धक्का कोणी दिला असेल तर तो माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद आणि मृत्युंजय सिंग यादव यांच्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शुक्रवारी बोलताना, पी. चिदंबरम यांनी भाजपसारखा सुसंघटित पक्ष दुसरा नसल्याचे सांगताना, इंडी आघाडीच्या भवितव्याबाबत शंका व्यक्त केली. विरोधकांची ही आघाडी अद्याप एकसंध आहे का, असा प्रश्न उपस्थित करून, आपल्याला तसे वाटत नसल्याचे ते म्हणाले. आघाडीच्या निर्मितीत सलमान खुर्शीद यांनी पुढाकार घेतला होता, त्यामुळे तेच अधिक माहिती देऊ शकतील, अशी पुष्टी त्यांनी जोडली. भाजपसारख्या प्रबळ पक्षाला तोंड देणे अतिशय कठीण असून, अनेक स्तरांवर पक्षाची बांधणी झाली असल्याने देशातील सर्व यंत्रणांवर पक्षाचे नियंत्रण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. २०२४ मधील लोकसभा निवडणूक निकालांनी लोकशाहीत निवडणूक किती महत्त्वाची आहे, हे दाखवून दिले आहे,
त्यामुळे २०२९ मधील निवडणुकीत भाजपने मुसंडी मारल्यास काँग्रेस पक्षाचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशा आशयाचे चिदंबरम यांचे निरीक्षण त्या पक्षाला सावधगिरीचा इशारा देणारे आहे. अर्थात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी त्याची किती दखल घेतात की, थरूर आणि चिदंबरम यांना भाजप समर्थक असल्याचे लेबल लावतात, हे लवकरच दिसून येईल. ज्या पक्षाला आत्मचिंतनाची गरज आहे, आपल्याच नेत्यांना सांभाळण्याची वेळ आली आहे पण त्याचे भान नाही, अशा काँग्रेस पक्षाने लोकसभा आणि राज्यसभेत तरी कामकाजात गांभीर्याने भाग घेऊन आपली उपयुक्तता आणि सजगता देशाला पटवून द्यावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून जरी काँग्रेसने काम केले तरी जनता त्या पक्षाला काही प्रमाणात तरी स्वीकारेल. ज्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना भवितव्याची शंका सतावते आहे, त्या पक्षाबद्दल जनतेला तरी कसा विश्वास वाटेल, असाच प्रश्न आजची स्थिती पाहता विचारावासा वाटतो.
अलीकडच्या भारत-पाकिस्तान संघर्षातही विरोधक एका सुरात बोलले नाहीत. प्रत्येक नेता भिन्न मत व्यक्त करीत होता. काँग्रेससह काही पक्षांना संसदेचे खास अधिवेशन बोलावून सरकारने या विषयावर चर्चा घडवून आणावी, माहिती द्यावी, वस्तुस्थिती सांगावी अशी मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या संवेदनशील विषयावर संसदेत चर्चा होणे आपल्याला मान्य नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे इंडी आघाडी एकच भूमिका घेऊन वाटचाल करू शकत नाही, असेच दिसून येते. अशा वेळी इंडी आघाडीचे नेतेपद, अस्तित्व आणि कार्य जनतेसमोर नेण्यासाठी काँग्रेस पक्षाला पुढाकार घ्यावा लागेल. जनतेच्या मनात आता एकच प्रश्न आहे की, काँग्रेस पक्षाला खरेच मित्रपक्षांना घेऊन पुढे जायचे आहे की स्वबळावर वाटचाल करायची आहे. हे ठरविणारी निर्णयक्षमता या पक्षाजवळ आहे का, हा मुद्दा आता महत्त्वाचा ठरतो.