आयएएस यशस्वीनी बी, अश्विन चंद्रू आणि स्नेहा गिते यांची अरुणाचल तर आयपीएस ओमवीर सिंग बिश्नोई यांची दिल्लीत बदली.
पणजी : गोमंतकीय भारतीय प्रशासकीय सेवेचे (आयएएस) ॲग्मू केडरचे संजीव गडकर आणि यतींद्र मराळकर या दोन अधिकाऱ्यांची अनुक्रमे जम्मू-काश्मीर आणि लडाखमधून पुन्हा गोव्यात बदली करण्यात आली आहे. तसेच आयएएस यशस्वीनी बी, अश्विन चंद्रू आणि स्नेहा गिते यांची गोव्यातून अरुणाचल प्रदेशमध्ये तर रमेश वर्मा, अरुण कुमार मिश्रा, सुनील अंचिपका यांची दिल्लीला बदली करण्यात आली आहे. याच प्रमाणे आयपीएस अधिकारी ओमवीर सिंग बिश्नोई यांची दिल्लीला बदली करण्यात आली आहे. वरील बदल्यांचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाचे अवर सचिव राकेशकुमार सिंग यांनी जारी केला आहे.
आयपीएस अधिकारी असलेले ओमवीर सिंग बिश्नोई हे गोव्यात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदावर कार्यरत होते. त्यांच्या जागी आयपीएस केशव राम चौरासीया (२००३) यांची दिल्लीहून गोव्यात बदली झाली आहे. आयएएस यशस्वीनी बी (२०२०) या उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी पदावर सेवा बजावत होत्या. तर स्नेहा गिते (२०१९) या विज्ञान-तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन खात्याच्या संचालकपदी सेवा बजावत होत्या. आयएएस अधिकारी अश्विन चंद्रू (२०१९) हे मुख्यमंत्र्यांचे ओएसडी म्हणून कार्यरत होते. संतोष जी. सुखादेवे (२०१७) यांची लडाख येथून तर अर्जुन मोहन (२०१९) यांची लक्षद्वीपहून गोव्यात बदली झाली आहे. याच प्रमाणे शकिल उल रादर (२०१३) यांची जम्मू काश्मीर येथून गोव्यात बदली झाली आहे.
थोडक्यात गोव्यातून एकूण सहा आयएएस अधिकारी व एका आयपीएस अधिकाऱ्याची अन्यत्र बदली झाली आहे. तर, इतर ठिकाणहून गोव्यात पाच आयएएस अधिकारी आणि एका आयपीएस अधिकाऱ्याची बदली झाली आहे.
गडकर आणि मराळकर यांच्या विषयी थोडक्यात :
गोमंतकीय आणि सध्या एग्मू कॅडरचे आयएएस अधिकारी असेलेले संजीव गडकर आणि यतींद्र मराळकर हे दोघे गोवा लोकसेवा आयोगामार्फत ९ जानेवारी १९९८ रोजी कनिष्ठ श्रेणी अधिकारी म्हणून राज्य सेवेत रुजू झाले होते. त्यांना वेळोवेळी बढती मिळाल्यानंतर २०२० साली आयएएसपदी बढती देण्यात आली. २६ जुलै २०२२ रोजी जारी आदेशात संजीव गडकर (२०१३) यांची जम्मू-काश्मीर तर, यतींद्र मराळकर (२०१३) यांची लडाखमध्ये बदली करण्यात आली होती.
बातमी अपडेट होत आहे.