एनआयओच्या अहवालातून माहिती समोर
पणजी : म्हादई जल लवादाने कर्नाटकच्या म्हादई वळविण्याच्या मंजूर केलेल्या दाव्यानुसार नदीचे पाणी वळवले तर संपूर्ण गोव्यावर फारसा परिणाम होणार नाही. मात्र कळसा प्रकल्पामुळे म्हादई अभयारण्याच्या उत्तर भागात मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे.
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने (एनआयओ) जारी केलेल्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे. हा अहवाल जर्नल ऑफ अर्थ सिस्टीम सायन्स मध्ये प्रकाशित झाला आहे.
एनआयओ शास्त्रज्ञ के अनिल कुमार, डी शंकर आणि के सुप्रित यांनी तयार केलेल्या अहवलानुसार लवादाने परवानगी दिल्यानुसार भांडुरा नाल्यातून २.१८ टीएमसी (६१.७३ दशलक्ष घनमीटर) पाणी वळवल्याने गोवा-कर्नाटक सीमेवरील (नदीच्या) विसर्गावर थोडासाच परिणाम होईल.
कळसा प्रकल्पात म्हादई अभयारण्याच्या उत्तरेकडील भागात जल लवादाने परवानगी दिलेल्या १.७२ टीएमसी (४८.७ दशलक्ष घनमीटर) पाणी वळवले तर याचा मोठा परिमाण होणार आहे.
ऑगस्ट २०१८ मध्ये निवाड्यात लवादाने कर्नाटकला एकूण १३.४२ टीएमसी (३८० एमसीएम) पाणी मंजूर केले होते. त्यापैकी ८.०२ टीएमसी (२२७ एमसीएम) प्रस्तावित म्हादई जलविद्युत प्रकल्पासाठी, १.५ टीएमसी (४२ एमसीएम) खोऱ्यातील वापर आणि सिंचनासाठी होते.
तसेच कळसा प्रवाहातून १.७२ टीएमसी (४८ एमसीएम) आणि प्रस्तावित भांडुरा धरणावर २.१८ टीएमसी (६१ एमसीएम) पाणी वळविण्यास परवानगी दिली होती. लवादाने एकूण कर्नाटकला म्हादई खोऱ्यातील ११० एमसीएम पाणी मलप्रभामध्ये वळविण्याची परवानगी दिली.
संशोधकांच्या मते, गोव्याने पाणी वळविण्याच्या परिणामांचा दावा केला होता. सदर दावा न्यायाधिकरणाने मान्य केला होता, मात्र तो योग्य नाही. कारण याचा परिणाम मर्यादित आहे.
या प्रकल्पांमुळे मांडवी नदीच्या मुखाशी किंवा कुंभारजुआ कालव्यातील जलवाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. मांडवीतील जलवाहतूक ही भरती-ओहोटीमुळे शक्य होते. जेव्हा म्हादईचा नैसर्गिक प्रवाह कमी असतो तेव्हा देखील वाहतूक शक्य असल्याचे अहवालात म्हटले आहे.
आरजीकडून निषेध
एनआयओ अहवालात म्हादईचे पाणी वळवले तरी गोव्याला फरक पडणार नाही, असे म्हटले आहे. या गद्दारीचा आम्ही निषेध करतो. येत्या विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार. तसेच म्हादई सभागृह समितीला पत्र लिहून विचारणा करणार असल्याचे आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी सांगितले.