रस्ते अपघात रोखण्यात भाजप सरकार अपयशी : आलेमाव
पणजी : गेल्या सहा वर्षांत गोव्यात १३०० पेक्षा अधिक लोकांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. राज्य सरकार अपघात रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गुरुवारी केली. दररोज अपघात घडतात. त्यात तरुणांचे नाहक बळी जातात. मात्र वाढत्या अपघातांवर अंकुश ठेवण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. असे ते म्हणाले.
२०२३ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यातील 'ब्लॅक स्पॉट्स' हटवण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा सुधारण्यासाठी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. सरकारने खरोखरच हे ब्लॅक स्पॉट हटवले आहेत का? याबद्दल सरकारने जनतेला माहिती द्यावी अशी मागणी आलेमाव यांनी केली. त्यांनी रस्त्यांच्या निकृष्ट दर्जा हे देखील अपघातांचे प्रमुख कारण असल्याचे म्हटले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खड्डे बुजवण्याचे अनेकदा आश्वासन दिले. मात्र अजूनही अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत. जेट पॅचर मशिन आणि खड्ड्यांची नोंदणी करण्यासाठी जारी केलेला व्हॉट्सअॅप नंबर देखील बंद पडल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सरकारकडून ठोस उपाययोजना अपेक्षित
रस्ते सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्वात आधी अपघातांना जबाबदार असलेल्या घटकांवर काम करणे आवश्यक आहे. सरकारने रस्त्यांची रचना, देखभाल आणि सुरक्षा याबाबत सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे, असे आलेमाव म्हणाले.