उन्हाळ्यात थंडावा देणारा वाळा

वाळा ही एक वनस्पती आहे. हे एक प्रकारचे गवत आहे. या वनस्पतीची मुळे सुगंधी असतात आणि ही मुळे उष्णता कमी करण्यासाठी वापरली जातात.

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
23rd March, 03:25 am
उन्हाळ्यात थंडावा देणारा वाळा

हवामान खात्याने सध्या गोव्यात उष्णतेची लाट येणार असा अंदाज लावला आहे. येत्या काही दिवसात तापमान जास्त वाढेल व वाढलेल्या उष्णतेमुळे होणारे त्रासही वाढतील. त्यामुळे बाहेर उन्हात जाताना योग्य काळजी तुम्ही घ्या व उकाडा कमी करण्यासाठी घरगुती उपायसुद्धा करा. मागच्या रविवारी तुम्ही उकाडा कमी करण्यासाठी अनेक उपाय वाचले. त्यात माठात पाणी घालून त्यात वाळ्याची मुळे घालावी असे मी सांगितले होते. काहींना हा वाळा कसा असतो ते माहीत नाही तर काहींना वाळा माहीत आहे पण कसा वापरावा हे माहीत नाही. चला तर मग आज जाणून घेऊया वाळ्याविषयी. वाळा ही एक वनस्पती आहे. हे एक प्रकारचे गवत आहे. या वनस्पतीची मुळे सुगंधी असतात आणि ही मुळे उष्णता कमी करण्यासाठी वापरली जातात. 

तुम्हाला माहीत आहे का??? या वाळ्याच्या मुळांपासून पूर्वी पंखा, टोपी, चटई, खिडकीला लावायचे पडदे बनवले जात होते. तुमच्या घरीसुद्धा एखादा वाळ्याचा पंखा किंवा टोपी असेल. मुद्दाम आपल्या आजीला विचारा. पूर्वी घरात ए.सी. नसायचा, अश्यावेळी उन्हाळ्यात खिडक्यांना वाळ्याचे पडदे लावून त्यावर पाणी शिंपडले जाई त्याने आत येणारी हवा थंड होत असे व उकाडा नाहीसा होत असे. 

या वाळ्याच्या सुगंधी मुळांपासून अत्तर सुद्धा बनवतात, शिवाय खस सरबत या नावाने वाळ्याचे सरबतसुद्धा बाजारात मिळते. मूळांचे चूर्ण उष्णता वाढून होणाऱ्या आजारांमध्ये जी औषधं आयुर्वेदात वापरली जातात ती बनवण्यासाठी वापरलं जातं. आंघोळीसाठी वापरले जाणारे साबण, उटणे यामध्ये सुद्धा वाळा चूर्ण वापरले जाते. 

उन्हाळ्यात वाळ्याची मुळे बाजारात विकत मिळतात. फ्रीज मधील गार पाणी पिऊन ज्यांना त्रास होतो, त्यांच्यासाठी वाळा उत्तम आहे. वाळा कसा वापरावा ते बघुया. 

१) वाळ्याच्या मुळांच्या दोन जुड्या करून ठेवाव्या. वापरताना स्वच्छ धुवून एक जुडी पिण्याच्या पाण्यात (मातीचा माठ वापरल्यास उत्तम) ठेवावी. दुसऱ्या दिवशी पाण्यातील जुडी काढून वाळत ठेवावी व दुसरी जुडी पाण्यात घालावी. असं आलटून पालटून एक एक जुडी वापरावी. असं रोज उन्हाळा संपेपर्यंत करावं. सुगंध नाहीसा झाला की नवीन मुळं आणावी.

२) उन्हाळ्यात  खूप घाम येतो व घामोळ्यामुळे शरीराला खाज येते. अश्यावेळी वाळ्याचे चूर्ण सुगंधी उटणे म्हणून वापरावे. वाळ्याच्या चूर्णाचा व चंदनाचा लेप शरीराला लावावा. 

३) वाळा थंड असल्याने त्वचेची आग होत असल्यास वाळा चूर्ण घातलेल्या पाण्याने आंघोळ करावी, म्हणजे थंडावा जाणवतो आणि घामोळेसुद्धा येत नाही. 

अजून तुम्ही वाळा वापरला नसेल तर यावर्षी आई बाबांना बाजारातून वाळा आणायला सांगा आणि मी सांगितल्याप्रमाणे त्याचा वापर करा आणि उन्हाळ्याचे त्रास दूर करा.


वैद्य कृपा नाईक,
आयुर्वेदाचार्य