तीन दिवसांपूर्वी भारत पाकिस्तान विरुद्धचा सामना हरणार असे भाकीत करून आयआयटी बाबाने क्रिकेट चाहत्यांचा रोष ओढवून घेतला होता. आता म्हणतोय कसा- 'मी काहीही बोलतो, तुम्ही मला इतके गांभीर्याने का घेता ?'
मुंबई : प्रयागराज महाकुंभ मेळ्यात सोशल मिडियामुळे अनायासे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अनेक पात्रांपैकी एक म्हणजे आयआयटी बाबा. एखादी गोष्ट आपली कुवत नसूनही प्रमाणाबाहेर मिळाली तर त्या गोष्टीची धुंद ही डोक्यात जाते असे म्हणतात. राणू मंडल ही या गोष्टीचे रास्त उदाहरण म्हणता येईल. त्यात आता आयआयटी बाबाची भर पडल्याचे दिसून येत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी त्याने एका पॉडकास्टवर विचारलेल्या एका प्रश्नाचे विचित्र उत्तर देऊन क्रिकेट चाहत्यांचा रोष ओढवून घेतला होता.
तीन दिवसांपूर्वी आयआयटी बाबाने एका स्ट्रीमर सोबत केलेआय लाईव्ह स्ट्रीममध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात भारताच्या पराभवाचे भाकीत केले होते. या नंतर भारतीय क्रिकेट रसिकांनी त्याच्या सोशल मिडिया हँडलच्या कमेंट सेक्शनवर धावा बोलत त्याचा खास ठेवणीतल्या अलंकारिक शब्दांनी उद्धार केला. मिम्सचा देखील पाऊस पडत आहे.
पहा व्हिडिओ
दरम्यान काल भारताने पाकिस्तानविरुद्ध नेहमीच्याच पद्धतीने खेळ केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली. बाबर आजम आणि मो. रिझवान यांनी सुमार दर्जाच्या खेळ केल्याने पाक संघाला आव्हानात्मक धावसंख्या देखील उभी करता आली नाही. भारताच्या गोलंदाजांनी व क्षेत्ररक्षकांनी एकमेकांस पूरक अशी कामगिरी करत पाक फलंदाजांना जेरीस आणले.
नंतर फलंदाजीला उतरलेल्या भारताने समयोचित खेळ केला. रोहित बाद झाल्यानंतर विराट आणि शुभमनने आव्हानात्मक बनत चाललेल्या खेळपट्टीवर नांगर टाकला. सुरुवातीला संथ गतीने सिंगल डबलवर भर देणारा विराट, शुभमन बाद झाल्यानंतर मात्र चवताळला. आपले अर्धशतक पूर्ण करत त्याने निरंतर बॉल प्लेसमेंटवर भर दिला. श्रेयस अय्यरनेही विराटला पूरक साथ दिली. अर्धशतक फटकावल्यानंतर तोही परतला. राहुल, पंड्या गेल्यानंतर अक्षर पटेल आला. तो पर्यंत भारताचा विजय सुनिश्चित झाला होता. शेवटी विराटने चौकार हाणत आपले ५१वे एकदिवसीय शतक पर्यायाने ८२वे शतक झळकावले व विजयश्री खेचून आणली. विराटलाच सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
यानंतर आय आयआयटीबाबा पुन्हा सोशल मिडियावर अवतरला आणि पुन्हा पचकला. मला माहितीच होते की भारत जिंकणार आहे. मी उगाच म्हटले होते. माझ्यामुळेच पाकिस्तानचा पराभव झाला. भारत आता थेट फायनलमध्ये जाईल. मला भास होताहेत.' असे त्याने टोचन दिले. यानंतर पुन्हा क्रिकेट चाहत्यांचा तांडा आयआयटी बाबाच्या सोशल मिडिया कमेंट सेक्शनमध्ये गेला. पुन्हा त्याचा उद्धार सुरू झाला. @breaking_bad23 या युजरने लिहिले, 'सुरुवातीला तुझे बोलणे ऐकून वाटले होते की तुझ्याकडून काही शिकायला मिळेल, पण तू सुद्धा भामटाच निघालास'. @rowdi_patel लिहतो, आयआयटीयन असला म्हणून काय जगातील सर्वच विषयांवर ज्ञान पाजळणार का बाबा ?.@simaant_vohra09 लिहतो, एखादा अभिनेता २-३ दिवस कॅमेऱ्यापासून दूर राहिला की त्याचा जीव कासावीस होतो असे ऐकले होते, आज प्रत्यक्ष पाहिले. प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जाणार हे आता. @rahu_ketu_ki_mahadsha म्हणतो, भास होत असतील तर पाणी टाकून घेत जा, उगाच नको तिथे कशाला आपण तज्ञ असल्याचा आव आणतोस? एकूणच आयआयटी बाबाचे वागणे आणि बोलणे यावर सोशल मीडिया आपले डोळे रोखूनच आहे. त्याची ही नसती उठाठेव कुणाच्याही पचनी पडल्याचे दिसत नाही.
दरम्यान त्याच्याच चाहत्यांनी त्याला टिकेच्या तोफेच्या तोंडी दिल्याने, नुकताच त्याने अजून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात तो म्हणतोय - 'मी काहीही फेकत असतो ! माझ्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही इतके सीरियस का घेता?. गँग्स ऑफ वासेपूरमधील एक पात्र आपल्या समोरच्या व्यक्तीला म्हणते- हिंदुस्तान में जब तक सिनेमा है तब तक लोग पागल बनते रहेंगे. आता सोशल मिडिया बाबत देखील हीच गोष्ट तंतोतंत खरी ठरू लागली आहे.