फ्रान्समधील कृत्रिम प्रज्ञा परिषद, एलन मस्क यांना हवे असलेले चॅटजीपीटी, सॅम अल्टमनचा मस्कला जबर टोला, ५०० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीतून स्टारगेट कंपनी उभारण्याची ट्रम्प यांची घोषणा... अशा प्रकारे कृत्रिम प्रज्ञेच्या वावटळाने जग प्रभावित झाले आहे.
गेल्या आठवडाभरात जगभर ज्या वेगवान घडामोडी घडल्या त्या कृत्रिम प्रज्ञा अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) या भोवतीच होत्या. त्यामुळे त्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या आहेत. तसे पाहता आता कुठे कृत्रिम प्रज्ञेचा शिरकाव विविध क्षेत्रात होत आहे. त्याचवेळी ही वावटळ उठणे स्वाभाविक आहे. ८० ते ९०च्या दशकात अशीच वावटळ कॉम्प्युटरची आली होती. मात्र, कृत्रिम प्रज्ञा जगभर नक्की काय काय घडवेल याचा अंदाज जाणकारांनाही येईनासा झाला आहे. त्यामुळे सध्या घडलेल्या घडामोडींकडे बारकाईने पाहणे आवश्यक आहे.
फ्रान्समध्ये कृत्रिम प्रज्ञेची जागतिक परिषद संपन्न झाली. भारत हा सहआयोजक होता. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यास हजेरी लावली, तर अनेक देशांचे उपाध्यक्ष, नेते, महत्त्वाचे मंत्री, कृत्रिम प्रज्ञेच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या विख्यात कंपन्यांचे प्रमुख, जाणकार, संशोधक, तज्ज्ञ असे सारेच जातीने हजर होते. कृत्रिम प्रज्ञा ही महाकाय संधी आहे की संकट याबाबत संदिग्धता आहे. नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच कृत्रिम प्रज्ञेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानालाही त्या आहेतच. त्याचा वापर कोण आणि कसा करतो यावर सारे काही अवलंबून आहे.
फ्रान्सच्या परिषदेत कृत्रिम प्रज्ञेबाबत सांगोपांग चर्चा झाली. या क्षेत्रात कुणा एकाची मक्तेदारी असता कामा नये, सर्वांना संधी मिळावी, क्षमतानिर्मिती आणि वापर यामध्ये लोकशाही पद्धतीने सर्वांना मुभा असावी, अशा मागण्या प्रामुख्याने झाल्या. नफेखोरी, सायबर गुन्हे घडू नयेत, व्यक्ती किंवा देशाच्या स्वातंत्र्यावर घाला येऊ नये, मक्तेदारीचा विळखा पडू नये अशा भावनाही व्यक्त झाल्या. कृत्रिम प्रज्ञा हे शस्त्र न बनता शाश्वत विकासाचे माध्यम बनावे यासाठी सर्वांनीच आग्रह धरलेला दिसतो. इथून पुढे कृत्रिम प्रज्ञेच्या क्षेत्रात काय घडामोडी घडतात यावर या परिषदेचे फलित अवलंबून राहील. कृत्रिम प्रज्ञेला या जगातील नवा आणि शक्तिशाली आविष्कारही म्हटले जात आहे, पण तो जगाच्या किंवा मानवाच्या कल्याणासाठी आहे की विध्वंसासाठी अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. त्यामुळे याबाबत अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांना चॅटजीपीटी या कृत्रिम प्रज्ञेवरील तंत्रज्ञानावर मालकी हवी आहे. त्यासाठीच त्यांनी ‘ओपन एआय’ कंपनीला थेट ९७.४ अब्ज डॉलरची ऑफर दिली. अर्थात आम्ही त्यास भीक घालत नसल्याचे ‘ओपन एआय’चे संस्थापक सॅम अल्टमन यांनी म्हटले आहे. तसेच, मस्क यांच्या मालकीचे एक्स (पूर्वाश्रमीचे ट्विटर) ९.७४ अब्ज डॉलरमध्ये खरेदी करण्याची भाषा अल्टमन यांनी बोलून दाखविली आहे. त्यामुळे मस्क आणि अल्टमन यांच्यात संघर्ष पेटतो की काय, अशी शंका वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे, ओपन एआयच्या स्थापनेवेळी मस्क हे अल्टमन यांच्यासोबत होते. काही वर्षांनी ते त्यातून बाहेर पडले. ‘ओपन एआय’ला नफेखोरीची लागण झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर मस्क यांनी ‘ओपन एआय’च्या विरोधात अनेक खटले दाखल केले आहेत. असे असताना अचानक ही कंपनी त्यांना स्वतःकडे का घ्यायची आहे? त्याचे कारण म्हणजे, कृत्रिम प्रज्ञेच्या क्षेत्रात ‘डीपसीक’ कंपनीद्वारे चीनचा झालेला शिरकाव. आगामी काळात जवळपास सर्वच क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञेचाच बोलबाला राहणार आहे. अशावेळी आपल्याकडे हुकमी एक्का असावा, असा मस्क यांचा प्रयत्न आहे. चॅटजीपीटी हे सर्वाधिक लोकप्रिय तंत्रज्ञान आहे. परिणामी, त्यावरची मालकी आगामी काळात सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा आणि बरेच काही देणार असल्याने मस्क कासावीस झाल्याचे दिसते.
अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तासूत्रे स्वीकारताच कृत्रिम प्रज्ञेचे महत्त्व लक्षात घेऊन तब्बल ५०० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीतून ‘स्टारगेट’ ही कंपनी सुरू करण्याची घोषणा केली. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांचे संचालक मंडळही घोषित केले. त्यात अल्टमन यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, मस्क यांची संपत्ती आहे ४३३ अब्ज डॉलरची आणि स्टारगेटची गुंतवणूक आहे ५०० अब्ज डॉलर. यावरूनच तिचे महाकाय महत्त्व प्रतित होते. डेटा सेंटर्सची निर्मिती, मायक्रोचीपचे उत्पादन यावर अधिक भर दिला जाणार आहे. उद्योजक असलेल्या ट्रम्प यांनी भविष्याचा वेध घेऊनच ‘स्टारगेट’ची मुहूर्तमेढ रोवली आहे. या कंपनीद्वारे कृत्रिम प्रज्ञेच्या क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडविण्याचा मानस ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. याद्वारे अमेरिकेत एक लाख नवे रोजगार निर्माण होणार आहेत. ‘अमेरिका प्रथम’ या धोरणाचाच हा एक भाग आहे. बदलत्या काळानुसार या क्षेत्रातही अमेरिका महासत्ता राहील, अशी तजवीज ट्रम्प करीत आहेत.
भारतानेही ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेवर आधारित कृत्रिम प्रज्ञेचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे घोषित केले आहे. जगाच्या तुलनेत आपण मागे राहू नये आणि मक्तेदारीच्या काळात आपल्याही म्यानात तलवारी हव्यात हा हेतू त्यामागे आहे. पुढील सहा महिन्यांत हे तंत्रज्ञान विकसित होईल, अशी मनीषा मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात भारताने हे तंत्रज्ञान विकसित केले आणि बाजारात उपलब्ध करून दिले तर ती बाब जागतिक पातळीवर गेमचेंजर ठरू शकेल. मात्र, स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान विकसित होण्यात कालापव्यय होऊ नये, अशीच मनोकामना अनेक तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
कृत्रिम प्रज्ञेच्या तंत्रज्ञानाने जगभरात आनंद, कुतूहल, भीती आणि चिंता निर्माण केली आहे. आजवर लागलेल्या अनेक मानवी शोधांनी जगभर काय चित्र उभे राहिले ते पहायला हवे. बॉम्ब असो की अण्वस्त्र किंवा आरोग्यासाठीचे काहीही. निर्मितीवेळी असलेला हेतू प्रत्यक्ष वापरावेळी भलताच बनल्याचा इतिहास आहे. कृत्रिम प्रज्ञेच्या बाबतीत ते होऊ नये, अशी प्रार्थना सर्वत्र होत आहे. कारण हे अतिशय घातक, अदृश्य आणि प्रचंड शक्तिशाली तंत्रज्ञान आहे. शिवाय त्यावर कुणा एका-दोघांची मक्तेदारी असणे जगाची चिंता वाढवणारे ठरेल. म्हणूनच या तंत्रज्ञानाचा वापर शाश्वत विकास, शांती आणि असंख्य जटील समस्या सोडविण्यासाठी झाला पाहिजे. जागतिक परिषदेचे सहयजमानपद स्वीकारून भारताने जगाला योग्य तो संदेश दिला आहे. आगामी काळात या क्षेत्रात कुठेही कमी न पडता संशोधन आणि उत्पादनाच्या क्षेत्रात भारताला मोठी मुसंडी मारावी लागेल.
- भावेश ब्राह्मणकर
(लेखक संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक व मुक्त पत्रकार आहेत.)