गांदरबल : जम्मू-काश्मीरमधील गांदरबल येथे बांधकांमाच्या साइटवर रविवारी रात्री उशिरा झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाची संघटना असलेल्या रेझिस्टन्स फोर्सने (टीआरएफ) स्वीकारली आहे. तपासयंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार टीआरएफ प्रमुख शेख सज्जाद गुल हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता.
गांदरबलमधील गगनगीर भागात श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावरील बोगद्याच्या बांधकामाच्या ठिकाणी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात बडगामचे डॉक्टर शाहनवाज मीर आणि पंजाब-बिहारमधील ६ मजुरांना आपला जीव गमवावा लागला. हल्ल्यानंतर रात्रीपासून गांदरबल आणि गगनगीरच्या जंगलात शोधमोहीम राबवली जात आहे. ही कारवाई अजूनही सुरू आहे. सुरक्षा दल हाय अलर्टवर असून आता नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी (एनआयए)ही पोहोचली आहे.
या दहशतवादी घटनेचे महत्त्वाचे मुद्दे
१) गगनगीर दहशतवादी हल्ल्यात २-३ TRF दहशतवादी सामील आहेत. गेल्या एक महिन्यापासून ते बांधकामाच्या जागेची रेकी करत होते. यामुळे दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच पळून जाण्यात यशस्वी झाले.
२) या हल्ल्यात पंजाब आणि बिहारमधील मजुरांना लक्ष्य करण्यात आले होते. याशिवाय पंजाबच्या गुरदासपूरचा गुरमीत सिंग, अनिल कुमार शुक्ला, फहीम नजीर, मोहम्मद हनिफ आणि बिहारचा कलीम यांची हत्या करण्यात आली होती. हे सर्वजण केंद्र सरकारच्या बोगद्या प्रकल्पात काम करत होते.
३) TRF ने आता बाहेरच्या लोकांना केले टार्गेट
टीआरएफने गेल्या दीड वर्षात आपली रणनीती बदलली आहे. पूर्वी TRF काश्मीर पंडितांची टार्गेट किलिंग करत असे. आता ही संघटना बिगर काश्मिरी आणि शीखांना लक्ष्य करत आहे. चार दिवसांपूर्वी शोपियानमध्ये बिहार मजूर अशोक चौहान यांची हत्या करण्यात आली होती. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.
४) बारामुल्लामध्ये दहशतवादी ठार, गांदरबल कनेक्शन नाही
गांदरबल हल्ल्यानंतर ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे, मात्र अद्यापपर्यंत त्याचा गंदरबलशी कोणताही संबंध समोर आलेला नाही. येथेही सोमवारी सकाळपासून शोधमोहीम सुरू आहे.
टीआरएफला भारतात दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारतीय अधिकाऱ्यांनुसार टीआरएफची निर्मिती पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्करने केली आहे. ही संघटना लष्कर आणि जैशच्या कार्यकर्त्यांना एकत्र करून स्थापन करण्यात आली आहे. २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर TRF अधिक सक्रिय झाले आहे.
TRF चे उद्दिष्ट:
२०२० नंतर, टार्गेट किलिंगच्या बहुतांश घटनांमध्ये टीआरएफचा सहभाग होता. काश्मिरी पंडित, स्थलांतरित कामगार, सरकारी अधिकारी, नेते आणि सुरक्षा दलांना लक्ष्य करते. ३७० हटवल्यानंतर, सरकारी योजना आणि काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसन योजनांतर्गत उभारलेल्या बांधकामांची तोडफोड करणे आणि अस्थिरता पसरवणे हे उद्दिष्ट आहे. त्यांनी सरकारी विभाग किंवा पोलिसांमध्ये काम करणाऱ्या स्थानिक मुस्लिमांनाही लक्ष्य केले आहे.
२०२४ मध्ये टार्गेट किलिंग
२०२४ मध्येही जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग करण्यात आली होती. या टार्गेट किलिंगची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. मात्र यामागे टीआरएफचा हात असल्याचे मानले जात आहे.
१) राजौरी २२ एप्रिल: राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी एका घरावर गोळीबार केला. यामध्ये ४० वर्षीय मोहम्मद रज्जाक यांचा मृत्यू झाला होता. तो कुंदा टोपे शाहदरा शरीफ येथील रहिवासी होता. एप्रिल महिन्यात टार्गेट किलिंगची ही तिसरी घटना होती. रज्जाकचा भाऊ लष्करात शिपाई आहे. १९ वर्षांपूर्वी याच गावात दहशतवाद्यांनी रज्जाकचे वडील मोहम्मद अकबर यांची हत्या केली होती. तो कल्याण विभागात कामाला होता. वडिलांच्या जागी रज्जाकला नोकरी मिळाली होती.
२) ८ एप्रिल शोपियान: गैर-काश्मीरी लोकल ड्रायव्हर परमजीत सिंग यांना दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील पदपवन येथे दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. ते दिल्लीचे रहिवासी होते. परमजीत ड्युटीवर असताना दहशतवाद्यांनी त्याच्यावर हल्ला केला होता. या घटनेनंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले.
३) १७ एप्रिल : बिहारमधील मजूर शंकर शाह यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. हल्लेखोरांनी त्याच्या पोटात आणि मानेवर गोळ्या झाडल्या.
४) ७ फेब्रुवारी हब्बा कडल: श्रीनगरमध्ये ७ फेब्रुवारी २०२४ रोजी हब्बा कडल भागात दहशतवाद्यांनी शीख समुदायाच्या दोन लोकांना एके-47 रायफलने गोळ्या घातल्या. अमृत पाल (३१) आणि रोहित मसिह (२५, रा. अमृतसर) अशी मृतांची नावे आहेत. अमृत पाल यांचा जागीच मृत्यू झाला. उपचारादरम्यान रोहितचा मृत्यू झाला.