आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंची हमी; रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होत असल्याचाही दावा
पणजी : काणकोण तालुक्यात किडनीशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचा राष्ट्रीय एजन्सीमार्फत सर्वंकष अभ्यास करण्यात येईल. याबाबत आपण केंद्रीय आरोग्य सचिवांशीही चर्चा करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गुरुवारी सभागृहात बोलताना दिली.
राज्यातील विविध तालुक्यांमध्ये किडनीशी संबंधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यात काणकोण तालुका आघाडीवर असून, तेथे ४४२ लोकांमागे एक रुग्ण आढळून येत आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी आरोग्य खाते काय उपाययोजना आखणार असा प्रश्न आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला होता. त्यावर बोलताना मंत्री राणे म्हणाले, काणकोणमधील किडनीशी संबंधित रुग्णांची वाढती संख्या निश्चित चिंताजनक आहे. काणकोणमध्ये असे रुग्ण वाढत असल्याची कारणे राष्ट्रीय एजन्सीमार्फत शोधण्यात येतील. त्याबाबत आपण केंद्रीय आरोग्य सचिवांशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
किडनीच्या आजारांनी ग्रस्त असलेले जे रुग्ण डायलेसिसचे उपचार घेत आहेत, त्यांची सरकार योग्य पद्धतीने काळजी घेत आहे. विविध भागांमध्ये डायलेसिस सेंटर्स उभी करून तेथे रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत, असेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.
डॉक्टरभरतीसाठी धोरणात बदल गरजेचेसभापतींकडूनही चिंता व्यक्त
सभापती तथा काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांनीही काणकोण तालुक्यात किडनीशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होणे चिंताजनक असल्याचे स्पष्ट केले. या रुग्णांना योग्य पद्धतीने उपचार मिळतील याकडे आरोग्य खात्याने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये तसेच विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारी इस्पितळांतील अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. अनेक सामूदायिक इस्पितळांमध्ये पुरेसे डॉक्टर, परिचारिका नाहीत. त्याचा फटका स्थानिकांना बसत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यावर बोलताना राज्यात डॉक्टरांचा मोठा तुटवडा आहे. राज्य सरकारच्या धोरणात बदल करून इतर राज्यांतील डॉक्टरांची नियुक्ती करण्याची गरज आहे. शिवाय डॉक्टरांच्या वेतन रचनेतही सुधारणा करावी लागणार असल्याचेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.