सहा महिन्यांत प्रणाली बसवणार; मंत्री मॉविन गुदिन्होंची माहिती
पणजी : ग्रामपंचायतींचे सचिव आणि कर्मचाऱ्यांनीच हजेरीसाठी लावण्यात आलेल्या बायोमेट्रिक सिस्टमचा गैरवापर केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी येत्या जानेवारीपर्यंत ‘एआय’ आधारित चेहऱ्यावरील ओळख प्रणाली सर्वच पंचायतींमध्ये बसवण्यात येणार असल्याची माहिती पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी गुरुवारी विधानसभा सभागृहात बोलताना दिली.
आमदार प्रेमेंद्र शेट यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. अनेक पंचायत सचिवांकडून इतर पंचायतींचा ताबा असल्याने ते कार्यालयात उपस्थित राहत नाहीत, काही कर्मचारीही वेळेवर कामावर जात नाहीत, त्यामुळे कामे खोळंबून स्थानिकांना फटका बसत आहे. पंचायतींचा कारभार योग्य पद्धतीने चालत नाही. त्यावर पंचायत खात्याने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार शेट यांनी केली. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री गुदिन्हो म्हणाले, राज्यातील सर्वच पंचायतींच्या सचिव आणि कर्मचाऱ्यांनी वेळेवर कामावर यावे, यासाठी पंच आणि कर्मचाऱ्यांसाठी बायामेट्रिक सिस्टम बसवण्यात आली होती. काही पंचायतींमधील ही सिस्टम सुरू आहे, तर काही ठिकाणी बंद आहे.
काही पंचायतींच्या सचिव आणि कर्मचाऱ्यांनी स्वत:हूनच या सिस्टममध्ये घोळ घातला आहे. त्यामुळे त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी ‘एआय’ आधारित चेहऱ्यावरील ओळख प्रणाली बसवण्यात येणार आहे. या प्रणालीचे काम सुरू आहे. ही प्रणाली इंटरनेटशिवायही चालू शकणार आहे. पंचायतीतील कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांची उपस्थिती आणि कामाचा ताण आदींवर या प्रणालीमार्फत नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सचिव आणि कर्मचाऱ्यांना कोणतीही कारणे देऊन कामावर वारंवार अनुपस्थित राहता येणार नाही. पंचायतींचा कारभार सुरळीत होण्यास या प्रणालीचा निश्चित फायदा होईल, असेही मंत्री गुदिन्हो यांनी नमूद केले.