-ढगफुटीमुळे हिमाचल प्रदेशातील शिमला आणि मंडी भागात मोठे नुकसान झाले आहे. येथे मोठ्या प्रमाणात लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत असून आतापर्यंत एकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
शिमला : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला आणि मंडी येथे ढगफूटीचा प्रसंग ओढवला असून अनेक लोक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. मंडईतील पदर उपविभागातील थलतुखोड परिसरातही मोठे नुकसान झाले आहे. या दोन्ही जिल्ह्यांत ढगफुटीमुळे एकूण ३० हून अधिक जण बेपत्ता झाले आहेत. घटनास्थळी बचाव पथके पाठवण्यात येत आहेत.
शिमल्यात २२ जण बेपत्ता
आपत्ती व्यवस्थापन विभागानुसार, हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर भागातील समेज खाड भागात गुरुवारी ढगफुटी झाली. या आपत्तीनंतर २२ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. शिमलाचे उपायुक्त अनुपम कश्यप यांनी एसडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाल्याचे सांगितले आहे.
मंडीत एकाचा मृत्यू, ११ बेपत्ता
दुसरीकडे, हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील द्रांग विधानसभेतील चौहरघाटी येथील टिक्कन आणि तेरांग गावातही ढगफुटी झाल्याची माहिती मिळाली असून, ११ लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी एका व्यक्तीचा मृत्यूही झाला असून त्याचा मृतदेह सापडला आहे. येथे घरांचेही नुकसान झाले आहे. मंडीचे उपायुक्त अपूर्व देवगन यांनी जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाल्याचे सांगितले.
हिमाचल प्रदेशमध्ये रात्री उशिरा बहुतांश ठिकाणी पाऊस पडला असून, कुल्लू आणि शिमलाच्या सीमेवर असलेल्या निर्मंद नावाच्या ठिकाणी पावसामुळे मोठ्याप्रमाणात भुस्खलन झाल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे, कुल्लूच्या सेंज खोऱ्यातील पार्वती नदीची पाणी पातळी वाढली आहे. दरम्यान कुल्लू जिल्ह्यातील मणिकर्ण खोऱ्यातील माळणा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या भिंतीला तडे गेल्याचेही काही लोक सांगत आहेत, मात्र नेमके के चित्र आहे हे पाणी ओसरल्यानंतरच कळेल. सध्या माळणा धरणाभोवती पूरसदृश्य स्थिती पाहायला मिळत आहे. पुरामुळे मनालीकडे जाणारा महामार्ग बंद करण्यात आला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हिमाचल प्रदेशातील विविध भागात ढगफुटीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीची दखल घेतली. जेपी नड्डा यांनी हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्याशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली आणि केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय मंत्री नड्डा यांनी माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा केल्यानंतर भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना मदतकार्यात सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत.