धोक्याचा घंटानाद

आधुनिक काळात सर्वांचे आयुष्य आता संगणकावर अवलंबून आहे. एक दिवस जरी संगणक बंद पडला तर काय होईल? याचा कदाचित विचार आपल्यापैकी कोणी केला नसेल. परंतु जे काही घडेल, ते कल्पनेपलीकडचे असेल आणि त्याचे परिणाम अणुबॉम्ब पडण्यापेक्षा भयानक असतील. याचा अनुभव काही दिवसापूंर्वीच आला आहे. १९८० च्या दशकात आपण संगणकाच्या बिघाडामुळे मोठ्या घटना घडलेल्या पाहिल्या. सॉफ्टवेअरमधील चुकीमुळे क्षेपणास्त्र चुकीच्या ठिकाणी पडलेले दिसले. अलिकडची घटना याच क्रमवारीतील पुढचा टप्पा आहे. यावर उपाय म्हणजे एक आपत्कालीन योजना आखली पाहिजे. ही काळाची गरज आहे.

Story: वेध |
28th July 2024, 04:54 am
धोक्याचा घंटानाद

आपले आयुष्य, दररोजचे कामकाज, आपल्या नोकऱ्या, आपला व्यवसाय, आपला रुपया, आपली ओळख, आपले सर्वकाही गोष्टी एकाच गोष्टीला जोडल्या आहेत. त्याला आपण कसे जोडलो गेलो हे जाणून घेत नाहीत किंवा ते ओळखण्याचाही प्रयत्न करत नाहीत. ती गोष्ट दुसरी तिसरी नसून संगणक आहे. ज्यांनी कधी संगणक पाहिले नव्हते, ज्यांनी कधी संगणक चालवले नाही, ज्यांचा कधीही संगणकाशी संबंध आला नाही या सर्वांचे आयुष्य आता संगणकावर अवलंबून आहे. एक दिवस जरी संगणक बंद पडला तर काय होईल? याचा कदाचित विचार आपल्यापैकी कोणी केला नसेल. परंतु जे काही घडेल, ते कल्पनेपलिकडचे असेल आणि त्याचे परिणाम अणुबॉम्ब पडण्यापेक्षा भयानक असतील. त्याचे एक लहान उदाहरण देता येईल आणि त्याचा अनुभव काही दिवसापूंर्वीच आला आहे. 

जगातील दिग्गज संगणक कंपनी मायक्रोसॉफ्टची सिस्टिम अचानक ठप्प पडली आणि तंत्रज्ञानावर आधारलेले जग अचानक थांबले. १७० देशांतील ८५ लाख संगणक बंद पडले. डिजिटल महासाथीची ही किरकोळ झलक होती. मग कालांतराने संगणक सुरू झाले असले तरी या धक्क्यातून सावरण्यासाठी बराच काळ जावू द्यावा लागणार आहे. या घटनेशी आपला काय संबंध असेही आपण म्हणू शकतो. परंतु असा विचार करण्याची चूक करू नका.

गावात, ग्रामीण भागात धानाची लागवड करणारा शेतकरी असो किंवा बंगळूरच्या आयटी कंपनीत बसलेला सॉफ्टवेअर इंजिनिअर असो या सर्वांचाच या घटनेशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संबंध आहे. आज संपूर्ण बॅकिंग सिस्टिम, रेल्वेची यंत्रणा, हवाई वाहतूक, आधार कार्ड सिस्टिम, पॅन कार्ड सिस्टिम, कॅशलेस सिस्टिम, वीज पुरवठा करणारी यंत्रणा, डिफेन्स सिस्टिम, मोबाईल, टिव्ही, इमेलपासून रुग्णालयातील सेवा, असे कितीतरी आपण नुसते उच्चारा, या सर्व गोष्टी एका सॉफ्टवेअरशी जोडलेल्या आहेत आणि आपण त्यावर पूर्णपणे विसंबून आहोत. या सर्वांच्या केंद्रस्थानी संगणक आहे. त्यावर नियंत्रण ठेवताहेत मायक्रोसॉफ्ट, गुगल, अमेझॉनसारख्या महाकाय कंपन्या. उदाहरणार्थ, ही सिस्टिम एकाचवेळी ठप्प पडली किंवा जाणीवपूर्वक बंद पाडली तर काय होईल. सर्वकाही थांबेल. पण यामुळे काय बिघडेल? असा तर्कही मांडला जावू शकतो. जेव्हा संगणक नव्हते तेव्हा कामकाज होत नव्हते का? परंतु अशी तुलना करू नका. आता सर्व काम मशिन करतात. प्रत्येक काम मशिनच्या मेंदूवर सोपविले आहे. चिप आणि सॉफ्टवेअर असणारे संगणक  काम करतात. मग हे ठप्प पडले तर आयुष्यच थांबेल. 

आधुनिक युगात आपले जग तुलनेने सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मवर खूपच अवलंबून राहिले आहे आणि त्यातील कोणतेच प्लॅटफॉर्म पूर्णपणे सुरक्षित नाहीये. आता तर एआयने ताबा मिळवण्यास सुरुवात केली आहे. जेव्हा तो सर्वव्यापी होईल, तेव्हा त्याची नुसती कल्पना करा. एआय हा एखाद्या मानवी मेंदूप्रमाणे काम करत असल्याचे अगोदरच स्पष्ट झाले आहे. त्यानुसार कामगिरी करू शकतो आणि प्रसंगी मनमानी देखील करू शकतो.

अर्थात मायक्रोसॉफ्टमधील बिघाडामागे मानवी चूक असल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु कारस्थानाची शक्यता बोलून दाखविणाऱ्या मंडळींनी एलियन हल्ल्यापासून ब्लॅकरॉक कंपनीच्या कुरापतीला जबाबदार धरले आहे. अर्थात त्याचे खरे कारण समजेलच असे नाही, परंतु ही केवळ धोक्याची घंटी नाही तर घंटानाद आहे. सायबर गुन्हेगार या घटनेचा मुक्तहस्ते फायदा उचलू शकतात. कोणताही देश, संस्था, हॅकर किंवा सायबर गुन्हेगार जागतिक तंत्रज्ञानाच्या मूलभूत व्यवस्थेवर कसा आणि किती घाव घालू शकतो, हे सांगणे कठीण आहे. कदाचित तिसरे जागतिक महायुद्ध ‌‘कॉम्प्युटर शटडाऊन‌’ने लढले जाईल, असेही म्हणता येऊ शकते. या कृतीने एखाद्या देशाची व्यवस्था खिळखिळी करण्याचे कामही होऊ शकते. किंवा एखाद्या गुन्हे प्रवृत्तीची संघटना कोणत्याही देशाच्या सिस्टिमला ताब्यात घेऊन आपल्या मागण्या मांडू शकते. आपण आपल्या सुविधेसाठी, सोयीसाठी तंत्रज्ञान विकसित केले, त्याचा स्वीकार केला आणि त्याचा आनंद घेत आहोत. हातपाय न हलविता सर्वकाही घडत आहे. रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्याची गरज नाही. आता सॉफ्टवेअरने लाल दिवा हिरवा होतो. डोकं लावण्याची देखील गरज नाही. आता आर्टिफिशियल इंटिलिजन्सही सर्वकाही करेल. आजाराचे निदान, उपचार किंवा शस्त्रक्रिया देखील मशिनच्या डोक्याने केले जाईल.  

प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात आणि तो सिद्धांत इथेही लागू आहे. यातील अडचण म्हणजे दुसरी गोष्ट माहीत असूनही काहीच करता येत नाही. कितपत बॅकअप ठेवणार? जागोजागी तंत्रज्ञान आहे त्यामुळे व्हायरस, हॅकर्स आणि गुन्हेगार पदोपदी असणार. पण प्रत्येक गोष्टीवर इलाज आहे. संगणकावरच्या अवलंबित्वाचा विचार केल्यास दरवर्षी तीस कोटी ब्रँडेड संगणकाची विक्री होते. तितक्याच प्रमाणात असेंबल मशिनची विक्री होते. सात अब्ज स्मार्ट फोन असून ते लाखोंच्या संख्येने वाढत आहेत. जगातील ९० टक्के कंपन्या मॅनफ्रेम सर्व्हरशी जोडलेल्या आहेत. जगातील ९५ टक्के बँकिंग सिस्टिम सर्व्हरला जोडलेला आहे. क्षेपणास्त्र प्रणाली संगणकातूनच हाताळली जाते. सर्व्हरवर अवलंबून राहण्याचे परिणाम म्हणजे ग्लोबल मल्टी क्लाउड स्टोरेजचा बाजार २०३२ पर्यंत १,११,३२६.६ दशलक्ष डॉलर होण्याची शक्यता आहे.

१९८० च्या दशकात आपण संगणकाच्या बिघाडामुळे मोठ्या घटना घडलेल्या पाहिल्या. सॉफ्टवेअरमधील चुकीमुळे क्षेपणास्त्र चुकीच्या ठिकाणी पडलेले दिसले. अलिकडची घटना याच क्रमवारीतील पुढचा टप्पा आहे आणि ते कमी होणे सोडा त्याची व्याप्ती वाढतच चालली आहे. पुढचा हल्ला कोठे होणार, हे कोणालाच ठाऊक नाही. प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांच्या मते, “जोपर्यंत मानव जात जेनेटिक मेकअप अणि डीएनए बदलून स्वत:ला नव्याने आखत नाहीत तोपर्यंत कॉम्प्युटर जनरेटेड रोबो हे आपल्या जगावर ताबा मिळवण्याचीं दाट शक्यता आहे.”

तुम्ही, मी काय करू शकतो. किती रोकड, कोणकोणत्या कागदपत्रांची कॉपी सोबत ठेवाल. मग पुन्हा लॅंडलाइन आणायचा का? घरी, कार्यालयात किती बॅकअप ठेवायचा. म्हणूनच युद्धकाळात नागरिकांना ज्याप्रमाणे सूचना दिल्या जातात, त्याचप्रमाणे सूचना देण्याची आणि सुरक्षा बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. करोना काळातही अशाच प्रकारे काळजी घेण्याचे आवाहन केले होते. एक आपत्कालीन योजना आखली पाहिजे. ही काळाची गरज आहे.


योगेश मिश्र, ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक