नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सरकारने नवी पेन्शन योजना 'वात्सल्य' जाहीर केली आहे. ही योजना लवकरच सुरू होणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. ही योजना अल्पवयीन मुलांसाठी असेल. यामध्ये पालक मुलांच्या नावावर असलेल्या एनपीएस खात्यात गुंतवणूक करण्यास पात्र असतील. मुलाने १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर, त्याचे खाते सामान्य एनपीएस खात्यात रूपांतरित केले जाईल. भविष्यात, तुमच्या मुलांना एकरकमी रक्कम आणि पेन्शनचा लाभ मिळेल.
एनपीएस ही कर बचत योजना आहे. या योजनेनुसार, १८ ते ६० वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती देशातील कोणत्याही बँकेत आपले एनपीएस खाते उघडू शकते. वयाच्या ६० वर्षांनंतर गुंतवणूकदाराला पैशाचा काही भाग मिळतो. तर दुसरा भाग पेन्शनच्या स्वरूपात मिळतो. आतापर्यंत या योजनेत कोणीही अल्पवयीन गुंतवणूक करू शकत नव्हता. मात्र आता वात्सल्य अंतर्गत पालकांना अल्पवयीन व्यक्तीच्या नावावरही गुंतवणूक करता येणार आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA)एनपीएसचे नियमन करते.
एनपीएस सर्वप्रथम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आले. २००९मध्ये हा लाभ खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही देण्यात आला . या योजनेत टियर-१ आणि टियर-२ अंतर्गत गुंतवणूक करता येते. टियर-१ ला सेवानिवृत्ती खाते आणि टियर-२ ला स्वयंसेवी खाते म्हणतात.
जेव्हा तुम्ही खाते उघडता तेव्हा तुम्हाला टियर-१ मध्ये ५०० रुपये आणि टियर-२ मध्ये १००० रुपये गुंतवावे लागतात. एनपीएस ही नियमित गुंतवणूक योजना आहे. यासाठी दरवर्षी योगदान देणे महत्त्वाचे आहे. निवृत्तीनंतर, गुंतवणुकीच्या ६० टक्के रक्कम एकरकमी मिळते. उर्वरित ४० टक्के पेन्शन योजनेअंतर्गत उपलब्ध आहेत.