२८ वर्षांतील आकडेवारी : किनाऱ्यावर पुन्हा वाळू भरण्याची प्रक्रियाही सुरू
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गेल्या काही वर्षांत गोव्यातील किनाऱ्यांची झपाट्याने धूप होत आहे. १९९० ते २०१८ या २८ वर्षांत राज्यातील १९.२ टक्के म्हणजेच एकूण १३९.६४ किमीपैकी २६.८२ किमी किनारपट्टीची धूप झाली आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी लोकसभा अधिवेशनात लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली. याविषयी दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय किनारी संशोधन केंद्राने देशभरात (एनसीसीआर) १९९० ते २०१८ दरम्यान किनाऱ्यांच्या होणाऱ्या धूपप्रक्रियेचा अभ्यास केला होता. संस्थेने गोव्याच्या १३९.६४ किमी सागरी किनाऱ्याचा अभ्यास केला होता. वरील कालावधीत उत्तर गोव्यातील ३६.४ किमीपैकी ६.६६ किमी म्हणजेच १८.३ टक्के समुद्र किनाऱ्याची धूप झाली आहे. दक्षिण गोव्यातील १०३.२४ किमी किनाऱ्यांपैकी २०.१६ किमी म्हणजेच १९.५ टक्के किनाऱ्याची धूप झाली आहे.
राज्यात विविध कारणांमुळे किनाऱ्यांची धूप होत आहे. असे असले तरी किनाऱ्यावर वाळू जमा होण्याची प्रक्रियाही सुरू आहे. यामुळे यापूर्वी झालेली धूप भरून निघत असते. १९९० ते २०१८ दरम्यान राज्यातील १९.१ किमी म्हणजेच १३.७ टक्के किनाऱ्यावर पुन्हा वाळू भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. यामध्ये उत्तर गोव्यातील १२ किमी (३३ टक्के) आणि दक्षिण गोव्यातील ७.१ किमी (६.९ टक्के) किनाऱ्यांवर वाळू भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
राज्यातील ९३.७२ किमी किनारा स्थिर
एनसीसीआरने केलेल्या अभ्यासानुसार, राज्यातील १३९.६४ किमीपैकी ९३.७२ किमी (६७.१ टक्के) किनारे स्थिर किंवा मजबूत स्थितीत आहेत. यामध्ये उत्तर गोव्यातील १७.७४ किमी, तर दक्षिण गोव्यातील ७५.९८ किमी किनाऱ्याचा समावेश आहे.