विविध संशोधक, लोकसंख्याशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञांच्या अहवालाचा हवाला देत अल जझीराने १९ जुलै रोजी नवीन अहवाल प्रसिद्ध केला असून यात कोरोना काळात भारत सरकारने केलेल्या चुकीच्या नियोजनावर भाष्य केले आहे. कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित घटकांवर देखील यात प्रकाश टाकण्यात आला आहे. दरम्यान भारत सरकार अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. वाचा सविस्तर
नवी दिल्ली : भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, कोरोना महामारीच्या पहिल्या टप्प्यात सुमारे १ लाख ४८ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, आता नव्या अहवालात सरकारचे हे आकडे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. जगभरातील १० मोठ्या लोकसंख्याशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञांच्या अहवालाचा हवाला देत अल जझीराने प्रसिद्ध केलेल्या या अहवालात म्हटले आहे की, २०२० मध्ये भारतात कोरोनामुळे सरकारी आकडेवारीपेक्षा ८ पट अधिक लोकांचा मृत्यू झाला. अहवालात म्हटले आहे की, कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात भारतात सुमारे १२ लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. सायन्स ॲडव्हान्स पब्लिकेशनने हा अहवाल १९ जुलै रोजी प्रकाशित केला.
हा अहवाल भारत सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१९-२० व २०२०-२१ च्या आधारेच तयार करण्यात आला आहे. अहवालात दिलेली आकडेवारी डब्ल्यूएसओच्या आकडेवारीपेक्षा दीडपट अधिक आहे. तपशीलवार केलेल्या संशोधनानुसार, २०२० मध्ये सवर्ण हिंदूंचे सरासरी आयुर्मान १.३ वर्षांनी घटले आहे. त्याच वेळी, अनुसूचित जातीच्या लोकांचे सरासरी जीवन दर २.७ वर्षांनी घसरले. याशिवाय भारतातील मुस्लिम नागरिकांचे आयुर्मान पूर्वीच्या तुलनेत ५.४ वर्षांनी घटले आहे.
भारतात कोरोनाचा प्रभाव पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून आला. भारतात एकीकडे पुरुषांचे सरासरी आयुर्मान २.१ वर्षांनी घटले तर महिलांचे ३ वर्षांनी घटल्याचे या अहवालात म्हटले आहे. जगभरातील आकडेवारीवर नजर टाकली तर विपरीत स्थिती आढळून येते. जगाच्या सरासरीचा विचार करता पुरुषांचे जीवनमान महिलांपेक्षा अधिक घसरले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, २०२० मध्ये कोरोनाचा पहिला टप्पा आणि २०२१ मध्ये डेल्टा लहरीसह दुसऱ्या टप्प्यानंतर, देशात महामारीमुळे ४.८१ लाख लोकांचा मृत्यू झाला.अल जझीरा अहवालात हे आकडे चुकीचे असल्याचे म्हटले आहे आणि दावा केला आहे की भारतात प्रत्यक्षात २०-६५ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
केंद्र सरकारने या आधी सरकारने डब्ल्यूएसओचा डेटा नाकारला होता. डेटा मिळवण्याचे मॉडेल चुकीचे असून ते भारतात योग्यरित्या लागू होऊ शकत नाही, असे सरकारने म्हटले होते. विशेष म्हणजे हे आकडे केवळ डब्ल्यूएसओचे नाहीत. अनेक सार्वजनिक आरोग्य तज्ञ आणि संशोधकांनी देखील सातत्याने भारत सरकारचा डेटा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. सेंटर फॉर ग्लोबल हेल्थ रिसर्चनेही डब्ल्यूएसओच्या आकडेवारीचे समर्थन केले होते. त्यांच्या संशोधकांना विविध स्त्रोतांद्वारे मिळालेल्या आकडेवारीनुसार भारतात कोविड-१९ मुळे सुमारे ४० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ३० लाख लोकांचा मृत्यू हा डेल्टा वेव्हमुळे झाला. या नव्या अहवालावर भारत सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, यानंतर सरकारच्या आकडेवारीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.