कारचालकावर कठोर कारवाईची मागणी
पणजी : चिखली येथे २३ मे रोजी रात्री उशिरा झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राणी बिंद (३५) यांचे काल (३१ मे) गोमेकॉ रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्या गेल्या आठ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होत्या.
ही घटना चिखलीच्या मुख्य रस्त्यावर घडली होती. राणी बिंद या आपल्या पाळीव कुत्र्यासोबत बाहेर पडल्या असता सुसाट वेगात असलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला तर राणी गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर तीच कार पुढे जाऊन आणखी दोन वाहनांना धडक देऊन थांबली. राणी यांना तत्काळ गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. मात्र, आठवडाभर उपचार सुरू असतानाही त्यांना वाचवता आलं नाही.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघातास जबाबदार असलेल्या कारचालक उल्हास नाईक याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीय, स्थानिक रहिवासी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.