रुमेवाडी, करंबळ, असोगा येथील शेतकऱ्यांचा विरोध
जोयडा : भांडुराचे पाणी मलप्रभा नदीत वळवण्यासाठी कर्नाटक सरकारने भुयारी कालवा तयार करण्याची योजना आखली आहे. यासाठी खानापूर तालुक्यातील रुमेवाडी, करंबळ आणि असोगा या गावांतील सुमारे ३३ एकर सुपीक जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, याला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत, जमिनी दिल्या जाणार नाहीत असा स्पष्ट इशारा दिला आहे.
शनिवारी भूसंपादन अधिकाऱ्यांनी रुमेवाडीत शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. बाजारभावापेक्षा संपादित जमिनीला चार पट दर दिला जाईल. शेतकऱ्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन भूसंपादन अधिकारी श्रीधर गोटूर यांनी शेतकऱ्यांना समजावताना दिले. या वेळी शेतकऱ्यांनी जमिनीचा बाजारभाव कितीही दिला तरी ती जमीन सरकारला देणार नसल्याचे ठामपणे सांगितले. उत्तर कर्नाटकाची तहान भागवण्यासाठी जमिनीचा बळी देणार नाही , अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.
या जमिनी वर्षभर उत्पादन देतात आणि नदीकाठी असल्याने अत्यंत सुपीक आहेत. याआधी राष्ट्रीय महामार्गासाठी झालेल्या भूसंपादनात अन्याय झाल्याचा अनुभव शेतकऱ्यांनी नमूद केला. त्यामुळे आता पुन्हा जमीन देणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बुधाप्पा चौगुले, दामोदर अवलकी, भोमानी चौगुले, नागेश घाडी, अमोल बेडरे, अनिल बेडरे, गणेश बेडरे, सिताराम बेहरे व आदी शेतकरी उपस्थित होते.