पणजी : गेले आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील सरासरी पावसाने शनिवारी संध्याकाळ पर्यंत शंभरी पार केली. शनिवारी सकाळी ८.३० पर्यंत राज्यात सरासरी ९९.१४ इंच पावसाची नोंद झाली होती. यंदा पावसाचे प्रमाण ५७.२ टक्क्यांनी अधिक आहे. यादरम्यान वाळपई येथे सर्वाधिक ११५ इंच पाऊस झाला. राज्यातील १३ पैकी ६ केंद्रात पाऊस शंभरीपार झाला आहे.
शनिवारी पावसाने राज्याला झोडपून काढले
राज्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटनांची नोंद झाली. तर काही ठिकाणी झाडे पडल्याने नुकसानीच्या घटनांची नोंद झाली. अनेक रस्त्यांवर पाणी साचून राहिले. तर नद्यांच्या पातळीत वाढ झाली. हवामान खात्याने २० ते २४ जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
राज्यात चोवीस तासात सरासरी २.१६ इंच पावसाची नोंद झाली. याकाळात पेडण्यात येथे सर्वाधिक ३.४८ इंच पावसाची नोंद झाली. यानंतर काणकोण येथे ३.३१ इंच तर वाळपई येथे २.८५ इंच पावसाची नोंद झाली. राज्यात १ ते २० जुलै दरम्यान सांगेत १११.१८ इंच, साखळीत १०८.१७ इंच, फोंड्यात १०५.२० इंच, काणकोणमध्ये १०३.४९ इंच तर पेडण्यात १०१.४८ इंच इंच पावसाची नोंद झाली आहे.