तुम्ही जर मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण या मार्गावर तीन दिवस चार चार तासांचे ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : तुम्ही मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण, उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून सलग ३ दिवस महामार्ग ४ तास बंद राहणार आहे. ११ ते १३ जुलै दरम्यान सकाळी आणि दुपारच्या वेळेत महामार्गावर ब्लॉक असणार आहे. कोलाडजवळील पुलाच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आला असून वाहतूक विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालकांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
महाराष्ट्राच्या महामार्ग वाहतूक पोलीस विभागाने संबंधित अधिसूचना जारी केली असून यात वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. कोलाड जवळील म्हैसदरा नदीवर नवीन पुल बांधण्यात येणार आहे.
समोर आलेल्या पुल बांधणीसाठी ५ गर्डर टाकण्यात येणार आहेत. यासाठी ११ जुलै ते १३ जुलै या तीन दिवसात हा ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी ६ ते ८ आणि दुपारी २ ते ४ अश्या दोन टप्प्यात ब्लॉक घेतले जाणार आहे. याकाळात महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. यादरम्यान प्रवासी वाकण पाली मार्गाने माणगावकडे प्रवास करु शकतात.
-वाहनचालकांना वाकण-पाली-भिसेखिंड-रोहा कोलाड मार्गे मुंबई गोवा महामार्गावर जाता येणार आहे.
-वाकण येथून महामार्गावरील वाहतूक पाली, रवळजे, निजामपूर माणगाव आणि त्यानंतर मुंबई गोवा महामार्गाकडे जाईल.
-याशिवाय खोपोली-पाली-रावलजे-निजामपूर-माणगाव मार्गे देखील वाहतुकीसाठी उपलब्ध आहे.