राहुल गांधींना अभ्यास करून बोलण्याचा धर्मगुरूंचा सल्ला

संपूर्ण माहितीशिवाय कोणत्याही धर्माबद्दल बोलू नये- जगज्योत सिंह

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd July, 02:51 pm
राहुल गांधींना अभ्यास करून बोलण्याचा धर्मगुरूंचा सल्ला

दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणाने कालची संसद गाजली. राहुल यांनी हिंदूं हिंसक असून ते द्वेष पसरवतात अशा आशयाचे वक्तव्य केल्यावर संसदेमध्ये एकाच गदारोळ माजला. तसेच राहुल गांधी यांनी  भगवान शिवाच्या अभयमुद्रेचा उल्लेख  करत थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. राहुल यांच्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी आसनावरुन उठून आक्षेप नोंदवला. या घटनेला काही काळ लोटताच आता विविध धर्मांच्या धर्मगुरूंनी राहुल गांधी यांना अभ्यास करून बोलण्याचा सल्ला दिला आहे. 

संपूर्ण समाजाची बदनामी करू नका- स्वामी अवधेशानंद गिरी

राहुल गांधींच्या भाषणावर स्वामी अवधेशानंद गिरी म्हणाले की, हिंदूंना हिंसक म्हणणे किंवा ते द्वेष पसरवतात असे म्हणणे योग्य नाही. राहुल गांधी असे वक्तव्य करुन संपूर्ण हिंदू समाजाची बदनामी करत आहेत. हिंदू समाज खूप उदारमतवादी आहे. हिंदू धर्मामध्ये सर्वांचा आदर केला जातो.'

प्रतीकात्मक मुद्रेचा इस्लामच्या तत्त्वज्ञानाशी संबंध जोडणे योग्य नाही- गद्दी नाशीन हाजी सय्यद सलमान चिश्ती

तर दर्गा अजमेर शरीफचे गद्दी नाशीन हाजी सय्यद सलमान चिश्ती म्हणाले की, "आम्ही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे विधान ऐकले आहे. त्यांनी 'अभयमुद्रा'चे प्रतिक इस्लामिक प्रार्थना किंवा इस्लामिक उपासनेशी जोडण्याबाबत आपल्या भाषणात उल्लेख केला. मात्र कोणत्याही प्रतीकात्मक मुद्रेचा इस्लामच्या तत्त्वज्ञानाशी आणि श्रद्धेशी संबंध जोडणे योग्य नाही." तर याच अनुषंगाने  सुफी सज्जादंशीन परिषदेचे अध्यक्ष सय्यद नसरुद्दीन चिश्ती म्हणाले की, "संसदेत बोलताना राहुल गांधी यांनी इस्लाममध्ये अभयमुद्रा असल्याचे म्हटले आहे. इस्लाममध्ये मूर्तीपूजेचा उल्लेख नाही. मी त्यांच्या या वक्तव्याचे खंडन करतो. 

संपूर्ण माहितीशिवाय कोणत्याही धर्माबद्दल बोलू नये:- जगज्योत सिंह 

बिहारमधील गुरुद्वारा पटना साहिबचे अध्यक्ष जगज्योत सिंह म्हणाले की, "विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने धर्मांबाबत वस्तुस्थिती सभागृहात मांडली ती अपूर्ण माहिती आणि चुकीची माहितीआहे. शीख, हिंदू किंवा इतर कोणताही धर्म असो, कोणत्याही धर्माबद्दल संपूर्ण माहिती असल्याशिवाय बोलू नये. जगज्योत सिंग म्हणाले की, 'ते हिंसेबद्दल बोलले हे खूप चांगले आहे, परंतु 1984 मध्ये शिखांवर झालेल्या हिंसाचाराबद्दल त्यांना कदाचित माहिती नाही. मला त्यांना सांगायचे आहे की, अनेक पीडितांचे कुटुंबीय दिल्लीतच राहत आहेत. राहुल गांधींनी एकदा त्यांच्याकडे जाऊन त्यांची माफी मागावी.'