भूमिगत वीजवाहिन्या, जुन्या वाहिन्या बदलण्याच्या कामामुळे वीजपुरवठा खंडित
वाळपई : गेल्या पंधरा दिवसापासून सत्तरी तालुक्याच्या अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण झाले आहेत. मागील काही काळापासून ही समस्या वाढत असून नागरिकांकडून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.
तर जुन्या वीज वाहिन्या बदलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने या कामांमध्ये व्यत्यय निर्माण होत असून सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याचे स्पष्टीकरण वीज खात्याने दिले आहे.
सध्या ठाणे या भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले असून ठाणे पंचायत क्षेत्र व म्हाऊस पंचायत क्षेत्रातील कोपर्डे या भागांमध्ये जुन्या वीज वाहिन्या बदलून त्या नवीन वीज वाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. काही वीज वाहिन्या ह्या भूमिगत स्वरूपाच्या आहेत तर काही ठिकाणी खांब बदलून त्यावरून केबल घालण्याचे काम सुरू आहहे काम काही महिन्यापूर्वी सुरु करण्यात आले होते. मात्र सातत्याने पाऊस लागत असल्यामुळे या कामात विलंब होत आहे. यामुळे सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडू लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुढील काही दिवसांत भूमिगत वीज वाहिन्या घालण्याचे आणि खांबावर वीज वाहिन्या बदलण्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर मात्र सातत्याने वीजपुरवठा उपलब्ध होणार असल्याचे खात्याने स्पष्ट केले आहे.