पूर आणि वादळामुळे झाडांची पडझड, अनेक रस्ते- महामार्ग पाण्याखाली
आसाम: जूनच्या अखेर पर्यंत देशाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून आसामला तडका बसल्याचे चित्र दिसत आहे. आसाम आणि अरुणाचलमधील लोक गेल्या एक महिन्यापासून पुराशी झुंज देत असून त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सद्यस्थितीत ते छावण्यांमध्ये राहत असून या पुरात 60 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 3 लाखांहून अधिक लोक बाधित झाले असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
रविवारपासून या भागात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून नदीच्या पाण्याने पुराचे रूप धारण केले आहे नागाव, दिब्रुगडसह डझनभर जिल्हे पाण्यात बुडाले आहेत. लोकवस्तीला ५ ते ६ फूट पाण्याचा वेढा पडला आहे. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवत आहेत. पूर आणि वादळामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
आसाममधील पूरस्थिती गंभीर होत असून काझीरंगा नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व्हमधील 233 वन शिबिरांपैकी 26 टक्क्यांहून अधिक पाण्याखाली गेली आहे. त्याचबरोबर भारत-चीन सीमेवरील अनेक भागांचा रस्ता संपर्क तुटला आहे. दरम्यान या पावसाळ्यात जुलै महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे पश्चिम हिमालयातील राज्ये आणि मध्य भारतातील नदीकाठच्या भागात पुराचा धोका निर्माण होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.